सोलापूर: सध्याच्या तीव्र उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना उन्हाची तलखी भागविण्यासाठी विहिरीत पोहायला गेलेली दोन किशोरवयीन मुले दगडी कठडा कोसळून ढिगाऱ्याखाली सापडली. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरपासून १७ किलोमीटर अंतरावर बोरामणी गावच्या शिवारात ही दुर्घटना घडली.‌

नैतिक सोमनाथ माने (१४) आणि संघराज हरिबा राजगुरू (वय १२) अशी या दुर्घटनेतील दोन मुलांची नावे आहेत. नैतिक माने हा इयत्ता नववीच्या वर्गात तर संघराज राजगुरू हा सातवीच्या वर्गात शिकत आहे. त्यांच्या शालेय परीक्षेचा निकाल सकाळीच लागून दोघेही उत्तीर्ण झाले होते.

परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद चेह-यावर घेऊन नैतिक माने व संघराज राजगुरू यांच्यासह अन्य तीन तीन मुले गावच्या शिवारात दत्तात्रेय शेळके यांच्या शेतातील विहिरीत उन्हाची तलखी भागविण्यासाठी पोहायला गेली होती. विहीर ३५ ते ४० फूट खोल होती. सर्व पाच मुले विहिरीत मनसोक्त पोहत असताना अचानकपणे विहिरीच्या एका बाजूचा दगडी भिंतीचा कठडा ढासळला. यात त्या बाजूकडे असलेली दोन्ही मुले दगडी भिंती कठड्याच्या ढिगा-याखाली सापडली.‌ सुदैवाने इतर इतर तीन मुले विहिरीच्या दुसऱ्या बाजूला पोहत असल्यामुळे ती बचावली.

दरम्यान, शेळके यांच्या शेतात आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतातील ग्रामस्थ धावून आले. सोलापूर तालुका पोलिसांसह दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य हाती घेऊन विहिरीतून दोन्ही मुलांना काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.‌ विहिरीत पाणी गढूळ असल्याने त्यातील खोलगट भाग दिसत नव्हता. विहिरीतील पाण्याचा उपसा केला जात होता. सायंकाळपर्यंत बचाव कार्य सुरू होते.‌

सध्याच्या उन्हाळ्यात नदी, तलाव, विहीर, ओढा, नाल्यात पोहायला गेलेले किंवा तेथे तोल जाऊन पाण्यात पडून बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना वाढत आहेत.