मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वाढलेला वेग याचा परिणाम म्हणून कोकणासह मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. कल्याण, वसई विरार, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला असून राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीत दमदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

दरम्यान, महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार आणि उत्तरप्रदेशातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात बुधवारी (३१ जुलै) आणि गुरुवारी (१ ऑगस्ट) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात, तर शुक्रवारी (३ ऑगस्ट) कोकणासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सर्वत्र पावसाची शक्यता

वातावरणातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतातील ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले आहे. पुढील सात दिवस राज्यात पावसाचा मुक्काम राहणार असून मुसळधार पाऊस सर्वदूर हजेरी लावणार आहे. मंगळवारी (३० जुलै) राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकणात बुधवापर्यंत (३१ जुलै) मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. विदर्भ, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात सोमवापर्यंत (२९ जुलै) पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे आणि परिसरात महिनाअखेरीपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पुढील चार दिवस विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत पाऊस मंगळवारनंतरच (३० जुलै) विश्रांती घेईल. ऑगस्टमध्ये पुन्हा मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.