दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी रणशिंग फुंकलेल्या निलेश लंकेंनी आज अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे जाहीर केलं. पारनेर येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांनी राजीनाम्याचे पत्र दाखवलं. तसेच शरद पवार गटाकडून दक्षिण अहमदनगर लोकसभेतून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. यावेळी त्यांनी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यावरही टीका केली. तसेच मधल्या काळात आपल्या काही निर्णयांमुळं पवार साहेबांना दुःख दिलं, अशीही कबुली लंके यांनी दिली.

यावेळी निलेश लंके यांनी दक्षिण अहमदनगर लोकसभेच्या खासदारांनी काय काम केलं? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला उत्तरेला (अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात), केंद्र आणि राज्याच्या योजना उत्तरेला मिळाल्या. आमच्या भोळ्याभाबड्या लोकांनी खासदारांना मतदान केलं, पण जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत निधी देण्याची वेळ आली की, पारनेरला सापत्नपणाची वागणूक दिली गेली. आता या सर्वांचा हिशोब आगामी निवडणूक करणार आहोत, असं आव्हान निलेश लंके यांनी दिले.

राजीनाम्याबाबत बोलताना अश्रू अनावर

आमदारकीचा राजीनामा देण्यावर लंके म्हणाले की, लोकसभेची निवडणूक लढविताना विरोधकांकडून आपल्याला अडचणीत आणलं जाऊ शकलं असतं. विरोधकांकडे वकिलांची फौज आहे. त्यामुळं पुढं जाऊन काही अडचण होऊ नये, म्हणून मी राजीनामा दिला.

मी आता अभिमन्यू झालोय

लोकसभेसाठी आमदारकीचा राजीनामा देऊन आपण अभिमन्यूसारख्याच चक्रव्यूहात प्रवेश केला आहे, असे निलेश लंके म्हणाले. पारनेरकरांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीला सहा महिने बाकी असतानाच मी राजीनामा देतोय, त्यामुळे माझ्या मतदारांना, कार्यकर्त्यांना या निर्णयाबाबत सांगणं महत्त्वाचं वाटतं. पण लोकसभा निवडणूक लढविणं आपल्या सर्वांच्या स्वाभिमानासाठी, सन्मानानाठी गरजेचं आहे, त्यामुळं मी राजीनामा दिला आहे, असे लंके म्हणाले.

अजित पवारांनी वाईट काळात मदत केली

कार्यकर्त्यांसमोर भाषण करत असताना निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही तोंडभरून कौतुक केलं. अजित पवारांनी वाईट काळात आपल्याला ताकद दिली. त्यांनी मला साथ दिली. पण जिल्ह्याच्या राजकारणात काही लोकांनी मला त्रास दिला. माझ्या समर्थकांना नोकरीवरून निलंबित केलं जात आहे. ज्या ज्या वेळी एखाद्याचा अहंकार टीपेला पोहोचतो, त्या त्या वेळी त्यांचा शेवट झाला आहे. रावणानेही अहंकार दाखवला, त्याचा नाश झाला. जिल्ह्यातील काही नेत्यांना सत्तेचा अहंकार झाला आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहे. पण माझ्याकडे जीवाभावाचे लोक आहेत. त्यांच्या जोडीने हा अहंकार गाडून टाकू, असेही निलेश लंके म्हणाले.