मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी रायगडसाठी १०० कोटींची मदत जाहीर केली असून पंचनामे झाल्यानंतर अंतिम मदत जाहीर करु असं सांगितलं. “इतिहास पाहिला तर अनेक वादळं ज्यांनी पचवली त्या शिवरायांची ही राजधानी आहे. त्यामुळे वादळ पचवणं रायगडाला काही नवीन नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१०० कोटींची मदत जाहीर –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यासाटी १०० कोटींच्या मदतीची घोषणा केली. वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यांचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करु असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं की, “आपण पॅकेज जाहीर करणार नसून तातडीनं रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारकडून १०० कोटी देत आहोत. एक अंदाज घ्यावा लागेल. उगाच वारेमाप घोषणा करण्यात अर्थ नाही. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानीकडे पाहत असताना पंचनामे कऱण्यास सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर अंतिम मदत जाहीर करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, केंद्राकडे मदत मागण्यासंबंधी विचारलं असता उद्धव ठाकरेंनी नुकसान झाल्यानंतर लगेच मागावं असं होऊ नये. आपण व्यवस्थित आढावा घेऊन मदत मागू असं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचं आश्वासन दिलं असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

“अनेक ठिकाणी पडझड झाली असून स्वच्छता करावी लागेल. जनावर मृत्यूमुखी पडलेलं असेल तर रोगराई होण्याची शक्यता आहे. वीजेचा पुरवठा पूर्ववत झाली पाहिजे. घरं पडली आहेत त्यांची सोय करण्यात येणार आहे. मदतीसाठी बाहेरुन टीम द्याव्या लागतील,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

आणखी वाचा- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“आज जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीच रायगडमद्ये यावं लागलं. निसर्गाचं रौद्ररुप आपण पाहिलं पण रायगडने ते अनुभवलं. ती दृष्य अत्यंत भीतीदायक होती. रायगडमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आलो आहे. जीवितहानी होऊ न देणं प्रशासनाचं काम असतं. पण सहा जण मृत्यूमुखी पडले हे दुर्दैव आहे. पैसे देता येतात पण घरातली गेलेली व्यक्ती परत येत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nisarga cyclone shivsena cm uddhav thackeray raigad sgy
First published on: 05-06-2020 at 15:38 IST