अहिल्यानगरः शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कमीअधिक स्वरूपाच्या सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातही बहुतांशी भागात पाऊस सुरू आहे. परिणामी भाजीपाला, कांदा पिकाचे नुकसान होत आहे.
जिल्ह्याच्या दक्षिण भागात अधिक स्वरूपाचा पाऊस होत आहे. तुलनेत उत्तर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात आज, शनिवारी सकाळी नोंदवलेला गेल्या चोवीस तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे (आकडेवारी मिमी.मध्ये)- अहिल्यानगर १९.२, पारनेर १३.५, श्रीगोंदे ९.१, कर्जत १७.७, जामखेड २०.१, शेवगाव १४.२, पाथर्डी २६.८, नेवासे ६.१, राहुरी ६.४, संगमनेर १.१, अकोले ०.९, राहता १.५, श्रीरामपूर २.९, कोपरगाव ०.२.
नगर शहर व परिसरात काल, शुक्रवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. मधूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी कोसळत आहेत. मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस सातत्याने सुरू आहे. हवामान विभागाने गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात वेळोवेळी यलो व ऑरेंज ॲलर्ट जारी केला होता.
आजही, शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी सुरू होत्या. अंधारून आल्याने चालकांना वाहने दिवे लावून चालवावी लागत होती. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले होते. नालेसफाईअभावी त्याचा निचरा झालेला नव्हता. सततच्या पावसाने रस्त्यावरील विक्रेत्यांचे मात्र हाल झाले. शहरात ऐन पावसाळ्यात अनेक भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवर चिखल पसरून ते निसरडे झाले आहेत. वाहनचालकांना कसरत करतच वाहने चालवावी लागत आहेत.
एखाददुसऱ्या दिवसाचा अपवाद वगळला तर गेल्या दहा दिवसांपासून पाऊस रोज हजेरी लावत आहे. अडगळीत गेलेल्या छत्र्या, रेनकोट नागरिकांनी बाहेर काढले आहेत.