पंढरपूर : भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर येथील विठ्ठल मंदिरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी केली जात आहे. तसेच मंदिरात फुले, हार, नारळ घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवा पसरू नये आणि काही संशयास्पद आढळ्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी केले आहे.
येथील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, प्रांत कार्यालय आणि मंदिर प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. मंदिर प्रशासनाने या पूर्वीच मंदिरात मोबाइल व कॅमेरासदृश प्रवेश बंदी केली आहे. मंदिरातील सर्व कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांना समितीने दिलेले ओळखपत्र परिधान करणे सक्तीचे केले आहे. मंदिर समितीच्या वतीने अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी केली जाते.
तसेच खासगी सुरक्षा यंत्रणादेखील कार्यरत आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे. येथील श्री विठ्ठल मंदिरास अतिरेकी कारवाईचा धोका लक्षात घेता २५ वर्षांपासून २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक यांच्या मार्फत मंदिराची सुरक्षा केली जाते.
मात्र सध्याच्या परिस्थितीत सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मंदिर परिसरात साध्या वेशात पोलिसांची गस्त सुरू आहे. येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. मंदिरात प्रवेशाच्या ठिकाणी भाविकांची तपासणी केली जात आहे. काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे. दरम्यान, मंदिरात हार फुले, नारळ नेयास बंदी घातली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवा पसरू नये असे आवाहन त्यांनी केले. एकंदरीत विठुरायाच्या दरबारी आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे.