वसंत मुंडे, लोकसत्ता

बीड : तुम्ही कोणाला मत देता आणि सरकारमध्ये कोण बसेल, हे सांगता येत नसल्याने मताला किंमत राहिली आहे काय? असा प्रश्न करत राज्याला स्थिरता आणि जातीपातीच्या राजकारणाला बाजूला ठेवणारे नेतृत्व हवे आहे. यासाठी मी मैदानात उतरणार आहे. मागच्या निवडणुकीत पडले, पण आता चारित्र्यहीन आणि पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना पाडणार, असा इशारा देत राज्यभर दौरा करण्याची घोषणा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी केली.

देश भ्रष्टाचारमुक्त झाला का? शेतकरी, शेतमजूर सुखी आहे का? गोपीनाथ मुंडेंचे स्मारक झाले का? अशा थेट प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी भाजप सरकारवरच हल्लाबोल करत घरचा अहेर दिला. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील भगवानभक्तीगडावर दरवर्षीप्रमाणे दसऱ्याला पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. ज्यांना पदे दिली ते मेळाव्यापासून दूर गेले. पण, जनता दूर जाऊ शकत नाही, असा टोला लगावला.

हेही वाचा >>> “जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत, ते…”, जुना प्रसंग सांगत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

राजकारणात जय-पराजय असतोच, पाय मोडल्यानंतर कुबडय़ा लागतात, पण त्या कुबडय़ा पक्षाने नव्हे तर जनतेने दिल्यामुळे मी ऑलिम्पिकच्या स्पर्धेत पोओचले. पाच वर्षांत मध्य प्रदेशमध्ये सहप्रभारी म्हणून काम केले. परळीसह इतर ठिकाणीही खूप काम केले. मात्र प्रत्येक वेळी लोक मला काही तरी मिळेल, याची आशा लावून बसतात. पण निराशाच पदरी पडली. आता मात्र माझे लोक संयम राखणार नाहीत. मी राजकारण करावे का सोडून द्यावे? असा थेट प्रश्न करून वैद्यनाथ कारखान्यावर कारवाई झाली तेव्हा दोन दिवसांत लोकांनी अकरा कोटी रुपये जमा केले. मात्र मी ते नाकारले असून केवळ त्यांचे आशीर्वाद घेणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऊसतोड कामगारांना न्याय मिळावा

मंत्री असताना ऊसतोडणी महामंडळ करता आले नाही. नंतर केवळ महामंडळाला गोपीनाथ मुंडेंचे नाव देऊन लोकांचे प्रेम मिळणार नाही. पुढच्या वेळी ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय मी दसऱ्याला तोंडही दाखवणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली. तर दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाची घोषणा होऊन दहा वर्षे झाली, ते का झाले नाही? असा प्रश्न करत आता ते करूच नका, जनतेसाठी काहीतरी करा. राज्याला स्थिरता आणि सर्व जाती, धर्माना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व निर्माण करण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे.

राज्यभर दौऱ्याची घोषणा

दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा केली. आता उर्वरित ठिकाणीही दौरा करण्याची घोषणा या ठिकाणी केली.