कराड : आरोग्यदायी, बहुगुणी अशा नाचणीच्या लागवडी-खालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असून, या वर्षी जावली तालुक्यात ४१० हेक्टर क्षेत्रापैकी १२९ हेक्टर क्षेत्रावरच नाचणीची लागवड झाली आहे. याची टक्केवारी फक्त ३१ टक्केच असल्याने दिवसेंदिवस कमी होणारे क्षेत्र पाहता भविष्यात हे पीक राहील की नाही असा प्रश्न असताना, नाचणीचे गाव कुसुंबीकरांनी मात्र यंदा नाचणीची विक्रमी लागवड केली आहे.

जावली तालुक्यातील कुसुंबी गावाने नाचणीचे गाव म्हणून गतवर्षी जाहीर होताना या पिकाच्या संवर्धनासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. हलक्या प्रतीच्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत नाचणी पीक चांगले येते. कुसुंबी गावातील कुसुंबी मुरा, चिकणवाडी या डोंगरावरील वस्त्यांमध्ये अतिपावसाच्या प्रदेशात नाचणीची लागवड केली जाते. कुसुंबी हे गाव ‘क’ वर्ग देवस्थान असून, या ठिकाणी दरवर्षी सुमारे चार लाखांपेक्षा जास्त संख्येने भक्तगण दर्शनासाठी भेट देत असतात. संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर केले होते. नाचणी हे पीक तृणधान्य प्रकारात मोडते.

कुसुंबीमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत नाचणीचे गाव म्हणून बहुमताने ठराव पारित केला. यासाठी आर्थिक व तांत्रिक मदत अमेरिकास्थित महाराष्ट्र फाउंडेशन व ॲवॉर्ड संस्थेच्या सहकार्याने मिळाले. आज कुसुंबीमध्ये महिला फार्मर प्रोड्युसर नावाने कंपनी सुरू असून, या माध्यमातून नाचणीवर प्रक्रिया केलेले अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि त्यांची बाजारपेठेत विक्री केली जाते. शेतकरी देखील नाचणी धान्याला बाजारातून मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात त्यांच्या पडीक क्षेत्रामध्ये सध्या हे पीक घेत आहेत. यामुळे कुसुंबी येथील शेतकरी महिलांना आपला आर्थिकस्तर उंचवण्यासाठी संधी निर्माण झाली आहे.

कुसुंबीचे सरपंच मारुती चिकणे म्हणाले, गावात पूर्वी तीस- पस्तीस टन नाचणी उत्पादन होत होते. जिल्हा प्रशासनाच्या नावीन्यपूर्ण गाव योजनेत नावणीचे गाव म्हणून कुसुंबीची निवड झाल्यानंतर कुसुंबीत नाचणीचे उत्पादन दुप्पट झाले असून, या वर्षी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन होण्याची आशा आहे.

महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष संगीता बेंदे म्हणाल्या, या वर्षी कुसुंबी गावातील शेतकऱ्यांनी नाचणीच्या लागवडीत मोठी वाढ केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पेरणी क्षेत्रात ३० टक्के वाढ झाली आहे. या मागचे कारण म्हणजे गावात जागृती निर्माण होणे, नाचणीसारख्या पोषक अन्नधान्याची वाढती मागणी, कृषी विभागाची साथ व मार्गदर्शन तसेच ॲग्रोमिलेट्स महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शाश्वत बाजारपेठेचा उपलब्ध झालेला आधार या उपक्रमामुळे महिलांना उत्पन्नाचे सुरक्षित साधन उपलब्ध झाले आहे. गावातील तरुण वर्गही आता आधुनिक पद्धतीने शेतीकडे वळताना दिसत आहे.