सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ च्या पूर्वतयारीला वेग आला आहे. कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत अधिकाधिक व्हावा यासाठी कंबर कसली आहे. जिल्हात ५६२२५ हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर नुकतीच जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत खरीप हंगामातील विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा यावर सखोल चर्चा झाली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे उपस्थित होते.
या बैठकीत श्रीमती नाईकनवरे यांनी कृषी विभागाच्या आगामी खरीप हंगामातील योजना आणि कार्यक्रमांचे विस्तृत सादरीकरण केले. शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांची माहिती सहजपणे पोहोचावी यासाठी तयार करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांच्या QR Code फलकाचे विमोचन देखील यावेळी करण्यात आले.
भात आणि नाचणी लागवडीवर विशेष लक्ष:
खरीप हंगाम २०२५ मध्ये भात हे प्रमुख पीक असून त्यासाठी जिल्ह्यात ५६२२५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून प्रति हेक्टर ३१०० किलोग्रॅम तांदूळ उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बदलते हवामान आणि पशु-पक्ष्यांच्या त्रासामुळे लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता असली तरी, कृषी विभाग शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि संरक्षण उपाययोजना पुरवण्यावर भर देणार आहे.
भातपिकाबरोबरच नाचणी पिकावरही लक्ष केंद्रित करण्यात आले असून जिल्ह्यात १२१७ हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड करण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रति हेक्टर २५०० किलोग्रॅम उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
बियाणे आणि खतांची उपलब्धता
शेतकऱ्यांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण बियाणे तसेच खते उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन केले आहे. भात बियाण्याची एकूण मागणी ९३५१.८४ क्विंटल असून आजपर्यंत ३१८७ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच, खतांची एकूण मागणी १९५५७ मे.टन असून सध्या २६०१ मे.टन खत उपलब्ध आहे. उर्वरित बियाणे आणि खतांचा पुरवठा देखील लवकरच सुरळीत केला जाईल, असे आश्वासन कृषी विभागाने दिले आहे.
गुणवत्ता नियंत्रण आणि तक्रार निवारण
शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभाग सतर्क आहे. बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक तालुका स्तरावर विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासोबतच, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर कृषी निविष्ठा तक्रार कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी आल्यास ते त्वरित या कक्षांशी संपर्क साधू शकतील.एकंदरीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विभाग खरीप हंगाम २०२५ यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
एआय तंत्रज्ञान वापर सुरू
जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे म्हणाल्या,आंबा आणि काजू या फळपिकावर हवामान बदलाचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते . या अनुषंगाने हवामानाचा पूर्व अंदाज शेतकऱ्यांना गेल्यास वेळेत उपायोजना होऊन नुकसान होऊ नये यासाठी AI आधारित प्रणाली विकसित करण्याचे काम सुरुवातीच्या टप्प्यात सुरू आहे.