जवळपास एक महिन्याच्या सत्तानाटय़ात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सरशी होत असल्याचे दिसत असतानाच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मात्र अचानक खेळाचे फासे उलटे पडले. उभा महाराष्ट्र नव्या आघाडीकडे उत्सुकतेने पाहात असतानाच शनिवारी सकाळी अचानक राजभवनावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत देशभरातील राजकीय वर्तुळास चक्रावणारा धक्का दिला.
राज्यात या सर्व घडामोडी होत असताना सामान्य जनता याकडे कसं पाहते, त्यांना हे पटलंय का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने केला आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्रातील राजकारण पाहून आनंद महिंद्रा म्हणतात…
शरद पवार यांच्या मुरब्बी राजकारणाचे बाळकडू प्यायलेल्याअजितदादांनीच महाआघाडीस कात्रजचा घाट दाखविला अशी चर्चा सुरू झाली, आणि भांबावलेल्या मनस्थितीत महाआघाडीचे नेते भविष्यातील परिस्थितीस तोंड देण्याची तयारी करू लागले. कोणत्याही संकटास आम्ही आता एकत्रितपणे सामोरे जाऊ असा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविला, तर भाजपने रात्रीस खेळ करून ‘फर्जिकल स्ट्राईक’ केल्याचा आरोप करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या खांद्यास खांदा लावून लढाईत उतरण्याचे संकेत दिले.