भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे. “२०२४ मध्ये शिंदे-फडणवीसांविरोधात जनमत जाईल,” या थोरातांच्या वक्तव्यावर बोलताना विखेंनी “त्यांनी आधी नाशिकमधील मविआ उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी,” असा टोला लगावला. ते सोलापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मला वाटतं नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. बाळासाहेब थोरातांनी आधी त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ते महत्त्वाचं आहे. त्याबद्दल थोरात का बोलत नाहीत.”

व्हिडीओ पाहा :

“प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढत आहे. कसबा निवडणुकीवरून प्रत्येकाला परिस्थिती बदलली आहे असं वाटत आहे. प्रत्येकाचं स्वप्नरंजन सुरू आहे. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ प्रत्येकजण पाहत आहे. ती स्वप्नं पाहणं आम्ही थांबवू शकत नाही. ती स्वप्नं पाहण्याचा आनंद त्यांना घेऊ दिला पाहिजे,” असं मत राधाकृष्ण विखेंनी व्यक्त केलं.

दरम्यान, शरद पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी पवारांवर खोचक शब्दात टीका केली. “शरद पवारांनी आता स्वप्नरंजन करणे थांबवले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्याकडेला पूर्वी जे पोपट बसत होते, त्यांची उपासमार तुम्ही का करता? भविष्य सांगणं त्यांचं काम आहे, ते काम त्यांना करू द्या, असे ते म्हणाले. तसेच देशात सध्या कोणतेही बदलाचे वारे नाहीत आणि असा बदल करण्याची जनतेचीदेखील इच्छा नाही”, अशी प्रतिक्रिया विखेंनी दिली.

कांद्यावरील राजकारणावरून मविआवर टीकास्र

यावेळी बोलताना त्यांनी कांद्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही प्रतिक्रिया दिली. विखे म्हणाले, “सरकारतर्फे नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जर राज्यात कुठे नाफेडतर्फे कांदा खरेदी होत नसेल तर त्याची चौकशी करून लगेच कार्यवाही केली जाईल.”

हेही वाचा : VIDEO: भाजपा खासदार सुजय विखेंना भेटणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “मी त्यांना संपर्क केला होता, ते…”

“कांद्याच्या अनुदानाबाबत बोलायचं झाल्यास यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण सरकार अनुदानासंदर्भात सकारात्मक आहे”, असे ते म्हणाले. तसेच “महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्याला कोणतीही मदत झाली नव्हती. गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासाठी मागच्या सरकारने एक रुपयादेखील दिला नव्हता”, अशी टीकाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगर जिल्ह्याच्या नामांतरावरही दिली प्रतिक्रिया

पुढे बोलताना त्यांनी नगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीवरही प्रतिक्रिया दिली. “नगर जिल्ह्याचे नामकरण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे, असा प्रस्ताव आहे आणि त्याला सर्वांचाच पाठिंबा आहे. अहिल्यादेवी यांचे जन्मगाव हे नगर जिल्ह्यात आहे. त्यांचे नाव जिल्ह्याला देणे हे भूषणावहच आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल”, असे ते म्हणाले. तसेच जिल्हा विभाजनाच्याबाबतीतही अनेक प्रस्ताव आहेत. राज्यातील जे मोठे जिल्हे आहेत त्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी दिली.