राहाता : अहिल्यानगर – मनमाड महामार्गाची पुरती वाट लागली असून, दररोज निष्पाप लोकांचे अपघातामध्ये बळी जात आहे. दुचाकीवरून प्रवास करत असताना दुचाकी खड्ड्यात आदळल्याने दुचाकीवरील तरुण बाजूला पडल्याने त्याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेले. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहराजवळील येवला नाका येथील बजाज शोरूम समोर घडली आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आज बुधवारी घटनास्थळी जाऊन रास्ता रोको आंदोलन करीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.

आदित्य कैलास देवकर (वय २८, रा. इंदिरापथ, कोपरगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. आदित्य याचा मंगळवारी रात्री बळी गेल्यानंतर आज बुधवारी सकाळी संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जाऊन रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी दीपक वाजे, अनिल गायकवाड, विनय भगत, दीपक वाजे, गगन हाडा, बालाजी गोर्डे, भरत मोरे, सुनील साळुंके, विजय खैरनार, संकेत पारखे, वासुदेव शिंदे आंदोलनात सहभागी झाले होते. अपघातास कारणीभूत बांधकाम विभागाचे अधिकारी असून, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. रस्ता दुरुस्तीसाठी तरुणांनी थाळी हातात घेऊन पैसे जमा केले. या रास्ता रोकोमुळे नगर-मनमाड रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती.

नगर-मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे. हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला असून, त्यात पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कोणत्याही प्रकारची प्रकाशव्यवस्था नसल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण झाले आहे. याच कारणामुळे आदित्य देवकर या मार्गावर आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना खड्ड्याच्या बाजूला पडला. आदित्य याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरवर्षी अनेक प्रवाशांचा या महामार्गावर बळी जात आहे. तरीही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात येत नसल्याबद्दल नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. स्थानिकांनी या अपघातानंतर तातडीने खड्डे बुजविण्याची आणि रस्त्यावर योग्य प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी केली आहे.