माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील कत्तलखान्याविरोधात रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला रायगडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. कत्तलखाना रद्द करून कंपनीने केलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ उखडून टाका, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 मोर्बा येथील ७० एकर परिसरात हा आशिया खंडातील सर्वात मोठा कत्तलखाना सुरू केला जाणार आहे. मात्र या कत्तलखान्याला सर्व स्तरातून तीव्र विरोध केला जातो आहे. तरीही शासनाची कुठलीही परवानगी नसतानाही सदर कंपनीने बेकायदेशीरपणे कत्तलखान्याचे बांधकाम सुरू केले असून, जवळपास २५ हजार चौरस फुटांत पत्र्याची शेड आणि तीन हजार चौरस फुटांत आरसीसी बांधकाम करण्यात आले आहे. यांत्रिक कत्तलखान्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीही दाखल झाली आहे.
मोर्चात रायगडमधील विविध भागांतून आलेले ५० ते ५५ हजार लोक सहभागी झाले होते. या मोर्चाचे रूपांतर जहीर सभेत करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाला मोर्बा कत्तलखानाविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष विजयराज खुळे, विश्व हिंदू परिषदेचे दीपक गायकवाड आणि जैन धर्मगुरू विनम्र सागर यांनी संबोधित केले. यावेळी खासदार अनंत गीते, भाजप जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते. तर शेकाप आमदार जयंत पाटील यांनी मोर्चाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर अलिबागमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी रायगडात सोमवारी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. अलिबाग, मुरुड, महाड, माणगाव, रोहा, पेण, पोयनाड, रेवदंडा येथील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. रिक्षाचालक संघटना आणि सहा आसनी रिक्षा संघटनांनीही आजच्या रायगड बंदला पाठिंबा दिला होता. बँका, एसटी सेवा, रुग्णालय सेवा, औषधांची दुकाने वगळता सर्वत्र शुकशुकाट होता. जोपर्यंत कत्तलखान्याचे बेकायदेशीर बांधकाम तोडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा समितीचे अध्यक्ष विजयराज खुळे यांनी दिला.