अलिबाग : रायगड जिल्‍हा परीषदेचया आरोग्‍य विभागात कार्यरत कर्मचारयांच्‍या वेतनाची समस्‍या अद्याप संपलेली नाही. या कर्मचारयांना वेळेवर वेतन मिळत नसल्‍याने त्‍यांच्‍या कुटुंबाची आर्थिक कुचंबणा होत आहे. कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्‍न या कर्मचारयांना पडला असून आरोग्‍य कर्मचारयांमध्‍ये संतापाचे वातावरण आहे.आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक, स्त्री परीचर, सफाई कामगार, शिपाई व इतर कर्मचारी यांचे वेतन मागील काही महिन्यांपासुन वेळेत होत नाही.

ग्रामविकास विभागाने यासंदर्भात दोन वर्षांपूर्वीच एक पत्र सर्व जिल्‍हा परीषदांना जारी केले आहे. दरमहा ५ तारखेच्या आत सर्व कर्मचारयांचा पगार झाला पाहिजे अशा शासनाच्या सुचना अंसताना देखील वेतन वेळेत होत नाही. पर्यायाने ऑनलाईनच्या प्रणालीवर सी बील स्कोअरवर याचा परीणाम होत असून तो खराब होत असल्‍याची कर्मचारयांची तक्रार आहे. कोणत्याही बॅकेंत काहीही चुक नसताना कर्मचारी वर्गाला नाहक अर्थिक नुकसान सहन करावे लागते. कर्जप्रकरणे मंजूर होताना अडचणी येत आहेत.वेतनाला सातत्याने विलंब होत असल्याने कर्मचा-यांना विविध समस्यांना तोंड दयावे लागते. गृहकर्ज, मुलांचे शिक्षण, घरभाडे, कुटंबियांचा औषधोपचार, बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना पैसे पाठविता न येणे या सर्व बाबींमुळे वेतन वेळेत न झाल्याने जिल्हा परिषद कर्मचा-यांना नाहक मनस्ताप व आर्थिक कुचंबणा होत आहे.

शासनाकडुन वेतनासाठी वेळेत निधी उपलब्ध होतो. जिल्‍हा परीषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी योनी वेतन वेळेवर अदा करण्‍याच्‍या सूचना वारंवार दिल्‍या आहेत तरीसुध्दा या महिन्याचे वेतन अदयाप पर्यंत झालेले नाही. काही अधिकारी आणि कर्मचारयांच्‍या दिरंगाईमुळे वेतनास विलंब होत असल्‍याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. वेतनास विलंब करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्‍यावर कारवाई करावी तसेच यापुढील वेतनास कोणताही विलंब होणार नाही , असे आदेश देण्‍यात यावेत अशी मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्‍हा परीषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेवून निवेदन देण्‍यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळेवर वेतन मिळत नाही ही मागील अनेक महिन्‍यांपासूनची आमची तक्रार आहे. परंतु वेतन वेळेत होत नाही. यासंदर्भात जिल्‍हा आरोग्‍य अधिकारयांनी संबंधितांना सूचना देवूनदेखील दिरंगाई केली जाते. मात्र त्‍याचा मनस्‍ताप सामान्‍य कर्मचारयांना आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांना सहन करावा लागतो. संबंधित अधिकारी , कर्मचारयांवर दफ्तर दिरंगाईबददल कारवाई व्‍हायला हवी. अमोल खैरनार, अध्‍यक्ष रायगड जिल्‍हा आरोग्‍य कर्मचारी संघटना