मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. औरंगाबादमधील सभेसंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राज ठाकरे ४ मेच्या अल्टिमेटमवर काय भूमिका घेणार? याची चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी खुलं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर जारी केलं असून त्यातून भोंगे उतरवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरेंनी नमूद केलं आहे. मात्र, असं करताना राज ठाकरेंनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून मशिदींवरील भोंगे न उतरल्यास त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं आहे. “देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही”, असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंन आव्हान! दरम्यान, भोंग्यांबाबत भूमिका मांडतानाच राज ठाकरेंनी शरद पवारांचं नाव घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बैगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे", असं आव्हानच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. "धार्मिक वळण देण्याचा प्रकत्न केला, तर उत्तर धर्मानेच दिलं जाईल" - वाचा पत्रातले सविस्तर मुद्दे! नागरिकांसाठी तीन कलमी कार्यक्रम! दरम्यान, राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सामान्य नागरिकांसाठी तीन कलमी कार्यक्रमच आपल्या पत्रात जाहीर केला आहे. “हिंदू सणांना सायलन्स धोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व नावांखाली अटी घालायच्या पण मशिगदींना कोणत्याही अटी नाहीत. संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसतं? म्हणूनच हिंदूंनो… १- त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.२- सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.३- मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांच्या त्रासाबद्दल तक्रार करावी. रोज करावी” असं या जाहीर पत्रात राज ठाकरेंनी आवाहन केलं आहे. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर आता ४ मे रोजी नेमकं काय घडणार? याची चर्चा सुरू झाली आहे.