राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या महिन्यात मोठी फूट पडली. पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार हे अनेक आमदारांना बरोबर घेऊन महायुतीत सहभागी झाले. आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करत अजित पवार आणि त्यांचा गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. त्यामुळे भाजपाशी हातमिळवणी का केलीत? शरद पवारांशी बंडखोरी का केलीत? असे प्रश्न सातत्याने अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांना विचारले गेले. त्यावर प्रत्येक वेळी अजित पवार गटाने “आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत” असं सांगितलं आहे. अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.

पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठीच्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरे यांनी अजित पवार यांची नक्कलही केली.

राज ठाकरे म्हणाले, अजित पवारांना विचारलं की आपण या सरकारमध्ये का आलात? त्यावर ते म्हणाले “महाराष्ट्राचा विकास करायला आलोय”. अरे कशाला खोटं बोलताय. ६ दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी काढली ना तुमची… पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मग हे सगळेजण टुणकन इथे (भाजपाबरोबर) आले. कारण, छगन भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं असणार. आत (तुरुंगात) काय काय असतं? जाऊ नका… आपण हवं तर इथे (भाजपाबरोबर) जाऊ पण तिथे (तुरुंगात) नको.

हे ही वाचा >> टोलनाकाफोडीवरून अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या काळात समृद्धी महामार्ग बनून वाहतुकीसाठी खुलाही झाला, मात्र, मुंबई-गोवा महामार्गाचं काम अर्धेही झालेलं नाही. मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने आवाज उठवला आहे. आता मनसेने या महामार्गासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या मागणीसाठी मनसेने निर्धार मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरे बोलत होते.