“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे.” असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री रामदास आठवले त्यांनी सातारा येथे केले. सातारा दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साताराचे अध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.

“राज ठाकरे यांना एवढ्या दिवसांनी आयोध्या आठवली आहे, त्यांना आयोध्याला जायचं आहे. पण त्यांनी यापूर्वीच अयोध्याला जायला हवं होतं. त्यांच्या विरोधात उत्तर भारतीयांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. आपण भारतात राहणारे सर्व भाषी एकच आहोत याचा विचार त्यांनी करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रीयांनी केला नव्हता, तेव्हा उत्तर भारतीय ब्राह्मण असणाऱ्या गागाभट्टांनी केला होता हा इतिहास लक्षात ठेवायला हवा.” असा सल्लाही त्यांनी ठाकरे यांना दिला.

भगवे वस्त्र परिधान करणारा माणूस वाद पेटवत नाही –

“मुंबईत मराठी माणसावर अन्याय होता कामा नये या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पण जी कामे यापूर्वी मराठी माणसं मुंबईत करायची ती कामे हल्ली मराठी माणसं करत नाहीत, म्हणून उत्तर भारतीय लोक मुंबईत वाढले आहेत. उत्तर भारतीयांनी त्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्य आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. असा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, हल्ली राज ठाकरे यांनी भगवे वस्त्र अंगावर घेतले आहे. परंतु हे भगवे वस्त्र हा क्रांतीचा आणि शांततेचा रंग आहे. भगवान गौतम बुद्धांनीही हे वस्त्र परिधान केले आहे. भगवे वस्त्र परिधान करणारा माणूस वाद पेटवत नाही. समाजा-समाजामध्ये विष कालवत नाही. तुम्ही हिंदू आहात तुम्हाला अयोध्याला जाण्याचा अधिकार आहे. त्यापूर्वी तुम्ही उत्तर भारत यांची माफी मागा. त्यांच्या मनाचाही विचार करा.” असेही आठवले म्हणाले.

त्यांची भूमिका म्हणजे सर्व हिंदू समाजाची भूमिका नाही –

याचबरोबर, “राज ठाकरे यांनी भोंगे पुढे करून वाद वाढविण्याचे काही कारण नाही. राज ठाकरे यांच्या भूमिकेला आमचा आणि भाजपचा अजिबात पाठिंबा असण्याचे कारण नाही. त्यांनी हनुमान चालीसा मंदिरात, मंदिरासमोर म्हणायला काही हरकत नाही. परंतु हनुमान चालीसा वरून भोंग्यावरून हिंदू, मुस्लीम वाद वाढवत आहेत ही त्यांची भूमिका योग्य नाही . त्यांच्या मनात हिंदुत्वाची जाणीव झाली झाली आहे, ही गोष्ट चांगली आहे. यावेळी त्यांनी मी असं करीन, मी तसं करीन अशी भूमिका घेणे आणि महाराष्ट्र राज्य पेटविण्याची भाषा त्यांच्याकडून त्यांना शोभत नाही. त्यांची भूमिका म्हणजे सर्व हिंदू समाजाची भूमिका नाही. त्यांना सर्व हिंदू समाजाचा पाठिंबा नाही, तर मूठभर लोक त्यांच्यासोबत आहेत.” असेही आठवले म्हणाले.

वादग्रस्त विधान करून जनतेमध्ये राहायचा प्रयत्न करतात –

राज ठाकरे वादग्रस्त भूमिका घेत आहे त्यांच्या भूमिकेला भाजपाचा पाठिंबा असण्याचे कारण नाही ते पूर्वीपासूनच वादग्रस्त विधान करून जनतेमध्ये राहायचा प्रयत्न करत असतात त्यांच्या भूमिका ते मांडत असतात सभा मोठ्या होतात नियोजन चांगलं करतात पण वाद लावण्याची भूमिका घेतली तर त्यांना यश येणार नाही. सगळ्या समाजाला, भाषिकांना बरोबर घेऊन जाणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती याची आठवण त्यांनी करून दिली.