केंद्र सरकारची नव्याने राजीव गांधी आरोग्य विमा योजना येत आहे. ही योजना समाजातील प्रत्येक घटकास उपयुक्त ठरणारी असून, प्रत्येक कुटुंबाला या योजनेंतर्गत अडीच लाख रुपयांचे वैद्यकीय अर्थसाहाय्य मिळेल, अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.राहाता तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थीचा मेळावा साकुरी येथे झाला. या वेळी ते बोलत होते. शिर्डीचे प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार अप्पासाहेब शिंदेदे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अॅड. रघुनाथ बोठे, नगराध्यक्ष कैलास सदाफळ, पंचायत समितीचे सभापती निवास त्रिभुवन आदी या वेळी उपस्थित होते.संजय गांधी निराधार योजनेंतर्गत राहाता तालुक्यात विविध योजनांचा लाभ घेणा-या लाभार्थिची संख्या ९ हजार ५११ आहे. जिल्ह्यातील हा उच्चांक आहे. सरकारच्या विविध योजनेंतर्गत तालुक्यास महिन्याला सुमारे ५५ लाख रुपये दिले जातात. अजूनही या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे. राजीव गांधी आरोग्य विमा योजना समाजातील सर्व घटकांना वरदान ठरणारी आहे. ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवून घरोघरी पोहोचविण्याचे काम जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी करावे असे आवाहन विखे पाटील यांनी केले.