महायुतीत रिपाइंच्या मागण्यांचा विचार न झाल्यास पुढील मार्ग ठरवावा लागेल असा इशारा देतानाच शिवसेनेने काही मागण्या अंशत: मान्य केल्या असल्या तरी भाजपकडून अद्याप कोणतीच अधिकृत चर्चा झालेली नाही हे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मान्य केले. यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याशी बोलणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूूमीवर ‘मतदार जोडो अभियान’ अंतर्गत आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीत भाजप आणि शिवसेनेकडून आगामी लोकसभा व राज्यसभा निवडणुकीसाठी रिपाइंला योग्य तो सन्मान दिला जाईल. अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस सोबत जाण्याचा विचार नाही. आम्ही लोकसभेसाठी सहा जागांची मागणी केली असून लवकरच चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.