रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील वाटद औद्योगिक वसाहतीचा वाद आता शिगेला पोहचला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने दंड थोपटत वाटद औद्योगिक वसाहती विरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा उफाळून येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
वाटद औद्योगिक वसाहती (एमआयडीसी ) विरोधात ग्रामस्थांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मानवाधिकारचे अॅड. असीम सरोदे यांनी उपस्थित राहून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. या मोर्चात आता शिवसेना ठाकरे गटाने उडी घेतली आहे. या एमआयडीसी विरोधात जाहीर पाठिबा देत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी वाटद एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची एक इंच जरी जमीन घेतली तर मी आडवा उभा राहीन. तुम्ही उद्योगमंत्री, पालकमंत्री असलात तरी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असल्याचे ठणकावून सांगितले. यावेळी बेटकर यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाचा डाव हाणून पाडू, असा इशाराच पालकमंत्री उदय सामंत यांना दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर म्हणाले की, ग्रामस्थांच्या जमीन बळजबरीने घेण्याचा कुणी प्रयत्न केला तर मी आडवा उभा राहीन. हे उद्योगमंत्री आमच्या पक्षात होते, तेव्हा वाटद एमआयडीसीबाबत त्यांची भूमिका वेगळी होती. आता मिंद्येगटात गेल्यावर त्यांची भूमिका कशी काय बदलली? असा सवाल ही बेटकर यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी रामदास कदम यांचा ही समाचार घेतला. ते म्हणाले, रामदास कदम म्हणतात कुणबी समाजाचा माणूस विधानसभेत जाऊन नांगर धरणार काय? आम्ही नांगर विधानसभेत धरायचा की शेतात हे दाखवून देऊ असा इशारा सहदेव बेटकर यांनी दिला. तसेच यावेळी वाटद एमआयडीसी विरोधातील आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याचे पत्र असीम सरोदे आणि प्रथमेश गवाणकर यांना सुपुर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत सांळुखे, उपतालुकाप्रमुख प्रकाश साळवी, महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख किरण तोडणकर, अमित खडसोडे, सुभाष रहाटे, मयुरेश पाटील, माजी नगरसेवक सलील डाफळे उपस्थित होते.