वसई-विरारमधील विद्युत पुरवठा पूर्ववत, मात्र सोसायटय़ांतील टाक्यांत दूषित पाणी
नालासोपारा पूर्वेतील धानिव भागात असलेल्या महापारेषणच्या उपकेंद्रात अति उच्चदाबाचा असलेल्या रोहित्रामध्ये बिघाडानंतर नवीन रोहित्र बसविण्यात आले असून शुक्रवारी दुपारपासून या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे मुसळधार पावसामुळे विजेविना हाल झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र त्याच वेळी पुरातील घाणीचे पाणी सोसायटय़ांमधील पिण्याच्या टाकीत गेल्याने टाक्यांमध्ये असलेले पाणी दूषित झाले आहे. यामुळे येथील नागरिकांना टाक्या स्वच्छ करण्याची वेळ आली आहे.
याआधी तीन दिवसांपासून मासवण येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घुसल्याने पाणीपुरवठा बंद झाल्याने येथील नागरिकांचे पाण्याविना हाल झाले होते, असे असतानाच मोठय़ा प्रमाणात झालेल्या पावसामुळे घाण पाणी हे सोसायटय़ांना पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत गेले आहे. जरी पालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असला तरी या टाकीच्या दूषितपणामुळे येथील नागरिकांना आणखीन समस्यांचा सामना करावा लागत आहे. या टाकीत जरी पालिकेचे पाणी आले तरी या पाण्यात पावसाच्या पाण्यामुळे जमा झालेला गाळ व घाण यामुळे हे पाणी दूषित झाले आहे. यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होऊ लागले आहेत.
या टाक्यांत साचलेला गाळ काढण्यासाठी सोसायटीमधील रहिवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. टाक्या पूर्ण स्वच्छ होत नाहीत तोवर पिण्यायोग्य पाणी मिळणार नसल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली. शहरात सध्या मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने पाणीटंचाईचे सावट होते. तो प्रश्न जरी मार्गी लागला तरी टाकीत गेलेल्या घाण पाण्यामुळे चिखल जमा झाला आहे. यामुळे टाक्या स्वच्छ होईपर्यंत पाण्याविना काही दिवस काढावे लागणार आहेत, असे नागरिकांनी सांगितले.
रोहित्राचे काम पूर्ण
रोहित्राचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची महावितरण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यासाठी महापारेषण व महावितरण विभागाचे दीडशेहून अधिक कर्मचारी कामाला लागले होते, अशी माहिती यावेळी महावितरण विभागाचे अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली आहे.