सोलापूर : अक्कलकोट-तुळजापूर रस्त्यावर एका मालमोटारीची दोन मोटारींना धडक बसून घडलेल्या अपघातात मोटारीमधील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला. तर अन्य चारजण जख्मी झाले. हे सर्व भाविक अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन दुपारी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे निघाले होते. चारूशीला अमोल रासकर (वय ३६, रा. मांजरी, पुणे) असे मृत भाविक महिलेचे नाव आहे. त्यांच्या सोबत असलेले त्यांचे पती अमोल विजय रासकर (वय ३६) व मुलगा प्रथमेश (वय १०) यांच्यासह चंद्रमा अभिजित रासकर (वय ३४, रा. हांडेवाडी, पुणे) आणि छाया विठ्ठल गुलदगड (वय ६५, रा. बारामती, जि. पुणे) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

यातील मृत आणि जखमी भाविक कुटुंबीय टाटा कंपनीच्या नेक्सान मॉडेलच्या (एमएच ४२ बीई ८६८१) मोटारीसह किया कंपनीच्या सोनेट मॉडेलच्या मोटारीने प्रवास करीत होते. अक्कलकोटच्या पुढे चपळगाव येथे समोरून येणाऱ्या मालमोटारीने (एमएच १३ सीयू ५१२८) दोन्ही मोटारींना ठोकरले. मालमोटारचालक ऋषिकेश दत्तात्रय पुरी (रा. आरळी, ता. तुळजापूर) यास अक्कलकोट उत्तर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त मोटारचालक अमोल विठ्ठल गुलदगड (वय २९, रा. लोणी भापकर, ता. बारामती) यांच्या फिर्यादीवरून मालमोटारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे‌.

बड्या व्यापा-यांच्या छळामुळे छोट्या व्यापा-याची आत्महत्या

कापड विक्री व्यवसायात झालेल्या आर्थिक व्यवहारात सोलापूर आणि अहमदाबाद येथील दोन व्यापा-यांनी पैसे वसुलीचा तगादा लावून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने मन:स्ताप करून घेत एका छोट्या व्यापा-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित एका महिलेसह दोघा बड्या व्यापा-यांविरूध्द मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र भागण्णा कल्याणी (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या व्यापा-याचे नाव आहे. त्याचे वडील भागण्णा शांतप्पा कल्याणी (वय ५५, रा. मंद्रूप) यांनी दिलेल्या पोलीस फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाने गेल्या १२ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर सोलापुरातील एका बड्या कापड व्यापा-याने मंद्रूपमध्ये मृत रवींद्र कल्याणी यांच्या घरी येऊन रवींद्र याने यापूर्वी आमच्याकडून कापड व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांची मागणी केली. मृत रवींद्र हा आत्महत्या करण्यापूर्वी प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. तो व्यापा-यांचे पैसे कसे फेडायचे, या विवंचनेत होता. त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी आत्महत्या करून स्वतःच्या जीवनाचा शेवट केला. त्यास संबंधित सोलापूर आणि अहमदाबाद येथील संबंधित दोघे बडे व्यापारी कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे‌.