Rohit Pawar On Sanjay Shirsat : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी आज एक मोठं विधान करत थेट राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ‘आता थांबलं पाहिजे, १० वर्ष नगरसेवक आणि २० वर्ष आमदार आहे, त्यामुळे आता कुठेतरी थांबायला पाहिजे’, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलं?
“संजय शिरसाट साहेब सिडकोत मलिदा खाताना कुठंतरी थांबावं असा विचार का आला नाही? आता मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. भूमिपुत्रांचा हक्क डावलून सिडकोची हजारो कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालणारी आपल्यासारखी व्यक्ती जेवढे दिवस राजकारणात राहील तेवढे दिवस लोकांचं नुकसानच होणार आहे”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
“आता वय पुढं करून पळ काढू नका, सरकारची ५-६ हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल! आता सुट्टी नाही, राहिला प्रश्न माझ्याबाबत तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचा, तर वेळ आणि ठिकाण तुम्ही सांगा…तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी समोरासमोर देतो माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या”, असं थेट आव्हानच रोहित पवारांनी संजय शिरसाट यांना दिलं आहे.
मा. संजय शिरसाठ साहेब सिडकोत मलिदा खाताना कुठंतरी थांबावं असा विचार का आला नाही? आता मंत्रीपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. भूमिपुत्रांचा हक्क डावलून सिडकोची हजारो कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालणारी आपल्यासारखी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2025
संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलं?
“मी अल्पसंतुष्ट असा व्यक्ती आहे. हे पाहिजे किंवा ते पाहिजे अशी मला कधीही इच्छा नव्हती आणि नाही. १० वर्ष मी नगरसेवक होतो, २० वर्ष मी आमदार आहे. ज्याचं कधी स्वप्न पाहिलं नाही ते सर्व पदे आपण भोगले आहेत. अखेरला काही काळानंतर माणसाचं वय थांबायला भाग पाडतं. आपण तिथपर्यंत विचार करायचा नाही. कधीतरी मध्येच थांबायचं का? हा प्रश्न माझ्या मनामध्ये काल आला. दररोजची धावपळ करण्यापेक्षा थांबायचं का? त्यामुळे मी मनाशी असं ठरवायचा प्रयत्न करतोय की आता थांबलं पाहिजे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
“मग यासाठी कोणाचा राजकीय दबाव किंवा कोणी काही बोललं किंवा कोणाच्या वैतागाने मी असं बोलतोय अशा काहीही भाग नाही. आज माझं ६४ वय आहे. मग स्वप्न पाहायचे म्हटल्यावर आपण काही स्वप्न पाहू शकतो. आता माझ्याकडे २०२९ पर्यंतचा वेळ आहे. २०२९ पर्यंत मी ६९ वर्षांचा होईल. मग वयाच्या ७० व्या वर्षी काय करायचं? याचा विचार तर केला पाहिजे ना. भविष्यात राजकारण हा जनतेच्या सेवेच्या संधीचा भाग जरी असला तरी आता माझ्याकडे असलेलं खातं चांगलं आहे, मी चांगलं काम करत आहे. त्यामुळे आणखी मला काहीतरी पाहिजे किंवा माझ्या अजून काही अपेक्षा आहेत, असं काही नाही. जे आहे, त्यात मी समाधानी आहे”, असं शिरसाट यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं.
