Rohit Pawar on Devendra Fadnavis Ad campaign : मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकलेल्या हजारो मराठा आंदोलकांच्या काही मागण्या मान्य करून आणि काही मागण्यांवर तोडगा काढून त्यांना परत पाठवल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात तीन जीआर (शासन निर्णय) काढले. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. दुसऱ्या बाजूला, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.
या सगळ्या घडामोडींनंतर राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन आणि मुंबईत काही ठिकाणी बॅनर लावून ‘देवाभाऊ’ हे कॅम्पेन (प्रचार) राबवण्यात आलं. हे कॅम्पेन नेमकं कोणी केलं, कोट्यवधी रुपये खर्च करून वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती कोणी दिल्या याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या जाहिरांतींमध्ये जाहिरातदाराचं नाव देखील नमूद केलेलं नाही,
रोहित पवारांकडून मोठा संशय व्यक्त
या जाहिरातींबाबत वेगळा संशय उपस्थित केला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही जाहिरात सरकारमधील एका मंत्र्याने दिली असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे हा मंत्री भाजपाचा नसून त्यांच्या मित्रपक्षाचा असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याबाबत एक पोस्ट केली आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“एकीकडे राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता. या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस यांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे.”
“मित्रपक्षाच्या मंत्र्याने निनावी पद्धतीने फडणवीसांच्या नावे जाहिराती का दिल्या?”
रोहित पवार म्हणाले, “मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील.”