राहाता : गोवा हा शांतीप्रिय प्रदेश असून आजपर्यंत मी अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांना निवडणुकीत प्रचार करताना पाहिले आहे. परंतु अद्यापही नगरपंचायत तसेच सरपंच पदाच्या निवडणुकीत देखील ते आपल्या पक्षाचा प्रभाव दाखवू शकले नाही, यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी त्यांचे नेते गोव्यात येऊन गेले मात्र निकाल भाजपच्या पारडय़ात असेल आणि साईबाबांच्या कृपाशीर्वादाने पुन्हा एकदा आम्हाला गोव्याच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळेल असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. शनिवारी सकाळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. याप्रसंगी साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी संस्थानच्या वतीने शाल व मूर्ती देऊन सत्कार केला. साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मी खूप भाग्यवान आहे की माझ्या हस्ते साईंची पाद्यपूजा करून मला साईबाबांचा आशीर्वाद मिळाला. गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरूद्ध अनेक पक्ष एकवटले आहेत. मात्र आमचा गोव्याच्या लोकांवर विश्वास असून ते आम आदमीच्या टोपीवाल्यांवर कदापि भरोसा करणार नाही. गोवा नेहमीच शांतीप्रिय प्रदेश राहिला असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सुशासन आणण्यासाठी येथील नागरिक आमच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून देतील असेही त्यांनी ठामपणे सांगितले. उत्तरप्रदेशसारख्या एवढय़ा मोठय़ा राज्यातील जनतेला रामराज्य आणी सुशासन पहायला मिळाले ते केवळ आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या सरकारमुळे, पाच वर्षे उत्तरप्रदेशात इन्फ्रास्ट्रक्चरबरोबरच ह्युमन डेव्हलपमेंट केले असल्याने देशातील सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये योगी आदित्यनाथ हे आयडॉल ठरले असल्याचे सांगितले. यावेळी शिर्डी शहर भाजपच्या वतीने भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी पुष्पगुच्छ देऊन सावंत यांचा सत्कार केला.