मराठा आरक्षणप्रश्नी आज ( १ नोव्हेंबर ) सर्वपक्षीय बैठक पार पडली. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला वेळ द्यावा आणि उपोषण मागे घ्यावे, असा ठराव सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत करण्यात आला. या बैठकांवर संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बैठकांमध्ये वेळ न घालवता सरकारनं ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनं तात्काळ या विषयात लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर संभाजीराजे म्हणाले, “मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. राज्यात आत्महत्या होत आहेत. मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न घालवता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी आहे.”

हेही वाचा : “सरकारच्या प्रामाणिकपणावर जरांगे-पाटलांनी विश्वास ठेवावा, कारण…”, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं आवाहन

“गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते. मात्र, मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाले व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला,” असं संभाजीराजेंनी म्हटलं.

हेही वाचा : “…तर मी आज संध्याकाळपासून पाणी सोडणार”; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही. अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात मात्र मार्ग सांगत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली मतपेटी सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील,” असा एल्गार संभाजीरांजेंनी केला.