DRDO Chairman Dr Samir V Kamat: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्यासमवेत, नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या मुख्यालयात विविध संरक्षण उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.
यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत म्हणाले की, “जर देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवायचे असेल आणि युद्धाच्या परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता निर्माण करायची असेल, तर आपल्याला संरक्षण क्षेत्राला संरक्षण उत्पादन आणि संरक्षण संशोधन व विकासात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल.”
ते पुढे म्हणाले की, “अलिकडच्या संघर्षात डीआरडीओ प्रणालींनी चांगली कामगिरी केल्याचे ऐकून मला खूप समाधान वाटले. आधुनिक युद्धाच्या उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण प्रणालींमध्ये आणखी सुधारणा कशी करू शकतो आणि नवीन प्रणाली कशा समाविष्ट करू शकतो हे पाहण्यासाठी आपल्याला या संघर्षातून शिकावे लागेल.”
डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी पुढे सांगितले की, “आम्ही अनेक नवीन प्रणालींवर काम करत आहोत. यामध्ये क्षेपणास्त्रे, हवाई-आधारित शस्त्रे, नौदल शस्त्रे आणि ड्रोन शोधू शकणारे आणि निष्क्रिय करू शकणारे विविध सेन्सर समाविष्ट आहेत. मला खात्री आहे की, पुढील सहा महिने ते एक वर्षाच्या आत या प्रणाली सेवेत समाविष्ट केल्या जातील. पुढील युद्ध लढण्यासाठी आवश्यक क्षमता असलेल्या आमच्या सेवा यातून पुरवण्यात येतील.”
भारतीय लष्कराची जगभरात चर्चा
दरम्यान पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले होते. यानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेलगतच्या शहरांवर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. ते भारतीय लष्कराने यशस्वीपणे हाणून पाडले होते. यानंतर जगभारात भारतीय लष्कराच्या अत्याधुनिक शस्त्रांची चर्चा सुरू झाली आहे.