सांगली : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृती कार्यक्रमामध्ये सांगलीच्या भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी अभिलेख विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक सुरेखा सेठिया यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत ३९६ गावांतील १ लाख ३२ हजार मिळकतपत्रिका तयार करण्यात आल्या.
श्रीमती सेठिया यांनी याबाबत सांगितले, शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेंतर्गत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सांगली कार्यालयामध्ये राज्य शासनाने दिलेल्या सात कलमी कार्यक्रमाप्रमाणे कार्यालयीन सोयीसुविधांबरोबरच प्रशासकीय कामकाजामध्ये उल्लेखनीय काम केले आहे.
श्रीमती सेठिया म्हणाल्या, भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती अद्ययावत करून, जनतेच्या सोयीसाठी सर्व माहिती प्रसिद्ध करण्यात आली. ई-रेकॉर्ड अंतर्गत अभिलेखाचे ई-साईनिंग करून जनतेसाठी ऑनलाइन ई-महाभूमी पोर्टलवर सदरचे अभिलेख उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे जनतेस शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तसेच स्वामित्व योजनेंतर्गत ३९६ गावांमधील १ लाख ३२ हजार ११८ इतक्या मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या.
कार्यालयामधील २३६ गठ्ठा बस्त्याचे नोंदणीकरण करून, त्याचे वर्गीकरण करण्यात आले. मुदतबाह्य अभिलेख नष्ट करण्याबाबत नियमांतर्गत कार्यवाही करण्यात आली. तसेच जड वस्तू संग्रहातील निरूपयोगी वस्तूंचे निर्लेखन करण्यात आले. आपले सरकार व पी.जी. पोर्टल प्रणालीवरील प्राप्त तक्रार अर्जाचे १०० टक्के निराकरण करण्यात आले. कार्यालयीन परिसर, स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यात आली. कार्यालयीन परिसरात हा अत्यंत सुंदररीत्या सजावट करण्यात आली असून, कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतासाठी बैठक व्यवस्था, पिण्याचा पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार व्यवस्था ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.