सांगली : चीनमध्ये तयार केला जाणारा बेदाणा नेपाळमार्गे चोरट्या मार्गाने, बेकायदारीत्या भारतात येतो आहे. त्याने भारतीय बेदाण्याचे दर पडले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही चोरटी आयात थांबवा, असे आवाहन खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केले.
या वर्षी बेदाणाउत्पादकांना चांगल्या दराची अपेक्षा होती. उत्पादन कमी झाले होते; मात्र, दर चांगले येणार होते. विशेषत: कृष्ण जन्माष्टमी आणि पुढे नवरात्रोत्सवानिमित्त उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बेदाण्याची मागणी असते. त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. तोवर गेल्या काही दिवसांत चीनचा बेदाणा मोठ्या प्रमाणात बाजारात आला आणि दराचा गोंधळ निर्माण झाला आहे. भारतीय बेदाण्याचा उठाव कमी झाला. दर पडले. याबाबत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने खासदार पाटील यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी संसदेचे या प्रश्नावर लक्ष वेधले.
ते म्हणाले, की सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्ष पीक घेतात. बेदाणानिर्मिती करतात. त्यातून त्यांना थोडे जास्त उत्पन्न मिळते. परंतु, गेल्या काही दिवसांत चीनमध्ये तयार होणारा बेदाणा नेपाळमार्गे भारतात येतो आहे. ही आयात बेकायदा आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बेदाण्याचा दर पडतो आहे. शेतकरी अडचणीत येत आहे. ते आत्महत्येचा विचार करत आहेत. त्यामुळे तातडीने ही आयात थांबवायला हवी.
याआधी बेदाणा निर्यातीला अनुदान मिळत होते. परिणामी भारतीय बाजारपेठेतील बेदाण्याची मागणी आणि आवक याचे गणित जमत होते. पुन्हा एकदा अनुदान सुरू करण्याची गरज आहे. बेदाणाउत्पादकांच्या हिताचा निर्णय सरकारने घ्यावा आणि त्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी या वेळी खा. पाटील यांनी केली.