सांगली : अर्धशतकानंतर दुष्काळी आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलाव मे महिन्यातच तुडुंब भरला असून, माणदेशातील माणगंगा नदी वाहती झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी ब्रिटीशकालीन राजेवाडी तलाव काठोकाठ भरला आहे.
आटपाडी तालुक्यात राजेवाडी येथे ब्रिटीशांनी हा तलाव बांधला असून, या तलावात माण तालुक्यासह माणदेशातून पाणी संकलित होते. माणगंगा नदीवर हा बांधण्यात आलेला राजेवाडी तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे परतीच्या पावसापर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत कोरडी असलेली माणगंगा नदी यंदा प्रथमच मान्सून हंगाम सुरू होण्यापूर्वीच वाहती झाली आहे. गेल्यावर्षी देखील राजेवाडीचा तलाव पावसाच्या पाण्याने भरला होता. तीन महिने माणगंगा नदी वाहत होती. तलावाची साठवण क्षमता १.९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता आहे. सध्या गाळ साचल्यामुळे या तलावाची साठवण क्षमता कमी झाली आहे.
राजेवाडीचा तलाव तालुक्यातील सर्वांत मोठा तलाव आहे. हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्याआधी पण वरचेवर पडलेल्या पावसाने थोडा पाणीसाठा झाला होता. आता तलाव ओसंडून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
दुष्काळी भागातील तरुण पाण्याची मौज घेण्यासाठी दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील धबधब्याच्या ठिकाणी जातात. यावर्षी मात्र तरुणांची पावले राजापूर तलावाच्या दिशेने पडू लागली असून, पावसाळी पर्यटनासाठी राजेवाडी तलावावर गर्दी होत आहे.