सोलापूर : मोहोळ तालुक्यात तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बलाढ्य ताकदीला टक्कर देणारे आणि यापूर्वी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून लढलेले संजय क्षीरसागर यांनी यंदा पक्षातून बाहेर पडत सोलापूर लोकसभेसाठी यशवंत सेना संघटनेची उमेदवारी घेतली आहे. मात्र त्यांचा हा निर्णय भाजपकडून बेदखल झाला असून त्यावर चर्चा टाळली जात आहे.

मोहोळ तालुका १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असताना या पक्षाचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्या विरोधात आव्हान देणारे मोहोळ येथील नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे बंधू संजय क्षीरसागर यांनी कधी शिवसेना तर कधी भाजपच्या माध्यमातून आव्हान दिले होते. विशेषतः मोहोळ विधानसभा मतदारसंघ २००९ साली राखीव झाल्यानंतर आतापर्यंतच्या तिन्ही निवडणुकांमध्ये तत्कालीन राष्ट्रवादीशी कडवी झुंज दिली होती. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून संजय क्षीरसागर हे तत्कालीन राष्ट्रवादीचे रमेश कदम यांच्या विरोधात ५३ हजार ७५३ मते घेऊन दुसऱ्या स्थानावर राहात ८३६७ मतफरकाने पराभूत झाले होते. तत्पूर्वी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे बंधू नागनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेने जाहीर केलेली उमेदवारी शेवटच्या क्षणी रद्द केली असता त्यांनी अपक्ष उभे राहून द्वितीय स्थानावरील ५२ हजार ४५२ एवढी मते घेतली होती. मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत नागनाथ क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राष्ट्रवादीविरुद्ध कडवी झुंज देत ६८ हजार ८३३ मते मिळविली होती. तथापि, अलिकडे भाजप व शिवसेनेच्या बदलत्या राजकीय प्रवाहात मोहोळचे क्षीरसागर बंधू दुरावले असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून मोहोळची राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मंडळी अजित पवार गटात सहभागी झाली. पर्यायाने हीच मंडळी सत्ताधारी महायुतीच्या माध्यमातून सत्ता वर्तुळात कायम राहिली. ज्यांच्या विरोधात तिन्ही विधानसभा निवडणुकीत जोरदार टक्कर दिली, त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक ज्येष्ठ नेते राजन पाटील यांचे महत्व सध्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडूनही कायम राहिले आहे. राजन पाटील यांच्याशी सलगी करताना त्यांचे विरोधक क्षीरसागर बंधूंची दखल भाजपकडून घेतलीही जात नाही. त्यामुळेच संजय क्षीरसागर यांनी भाजपमधून बाहेर पडत यशवंत सेनेच्या माध्यमातून सोलापूर लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी आणली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीवर कसलेही भाष्य न करता भाजपकडून क्षीरसागर बंधूंना बेदखल करण्यात आल्याचे दिसून येते.

हेही वाचा – सांगलीची जागा कॉंग्रेसलाच मिळेल – विशाल पाटील

हेही वाचा – जुने वितुष्ट संपवून आशिष शेलार यांचे सलमान खानशी जुळले मैत्रीचे सूर, उत्तर मध्य मतदारसंघ बांधणीस सुरुवात

भाजपने अन्यायच केला

मोहोळमध्ये राष्ट्रवादीची प्रचंड मोठी ताकद असताना त्यास चिवटपणे भिडण्याचे काम आम्ही केले आणि भाजपची बांधणी केली. परंतु आता याच भाजपने आम्हाला बेदखल केले आहे. हा आमच्या प्रामाणिक कामावर झालेला अन्याय आहे. म्हणून यशवंत सेनेकडून सोलापूर लोकसभेची जागा लढविण्याचा निर्णय घेतला. – संजय क्षीरसागर