Sanjay Raut on Congress face for CM : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारं येईल आणि उद्धव ठाकरे हे त्या सरकारचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावर महाविकास आघाडीतील दुसरा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली होती. पटोले म्हणाले होते, मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी एखादं वक्तव्य केलं तर ते आम्ही गांभीर्याने घेऊ. अन्यथा इतरांच्या वक्तव्यांबद्दल विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही. नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, “नाना पटोले यांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु, २०१९ च्या निवडणुकीनंतर मीच म्हणालो होतो की उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील. नाना पटोले त्यांच्या जागी बरोबर आहेत. त्यांनी केलेलं वक्तव्य देखील बरोबर आहे. महाविकास आघाडीचं सरकार येऊन आमचाच मुख्यमंत्री होणार आहे. दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी दुसरा कोणता चेहरा असेल तर ते त्यांनी जाहीरपणे सांगावं. काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा असेल आणि त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यता केली तर त्याला माझी हरकत नसेल. काँग्रेसमध्ये चेहरा असेल तर त्यांनी सांगावं की हा आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे. नाना पटोले ज्या नेत्याचं नाव सांगतील आम्ही त्याचं स्वागतच करू.”

खासदार राऊत म्हणाले, “मी नाना पटोले यांची अडचण समजू शकतो. सर्वांची बाजू समजू शकतो. नाना पटोले आमचे मित्र आहेत, आमचे सहकारी आहेत. परंतु, मी महाराष्ट्राला प्रिय असणाऱ्या चेहऱ्याविषयी बोलतोय. मात्र, नाना पटोले यांच्या मनात एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्यांनी ते सांगावं. मी मात्र राज्यातील ११ कोटी लोकांच्या मनात कोणता चेहरा आहे त्याबद्दल बोलत आहे आणि मला त्याबद्दल बोलण्याचा अधिकारही आहे.”

हे ही वाचा >> Supriya Sule : “मी संसदेत प्रश्न मांडते तेव्हा मझ्या पतीला…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही?

राऊत यांची ही प्रतिक्रिया पाहून त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी प्रश्न विचारला की तुमच्या वक्तव्याचा आम्ही काय अर्थ काढायचा? काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा नाही असं तुम्ही म्हणत आहात का? त्यावर संजय राऊत म्हणाले, “तसं नाही, परंतु काँग्रेसने सांगायला हवं… ही लोकशाही आहे… त्यांनी त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगावा.” यावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी संजय राऊत यांना म्हणाले, काँग्रेसकडे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले, “त्यांच्याकडे अनेक नेते आहेत पण काँग्रेसने त्यांची नावं जाहीर करावी. काँग्रेसने १० जणांची यादी जाहीर करावी की आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी हे १० चेहरे आहेत.”