भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असं विधान फडणवीसांनी केलं. ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी अनेक खुलासे केले आहेत.

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार अशाप्रकारे धोकेबाज राजकारण करणार नाहीत. मी त्यांना चांगल्याप्रकारे ओळखतो,” असं संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी नैराश्यातून हे विधान केलं असावं, असंही ते म्हणाले.

फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबद्दल विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “मला असं वाटत नाही की, शरद पवारांशी चर्चा करून पहाटेचा शपथविधी घेतला. मी शरद पवारांना जास्त ओळखतो. शरद पवार असं धोकेबाज राजकारण करणार नाहीत. पण फडणवीसांनी हे विधान नैराश्यातून केलं आहे.”

हेही वाचा- ‘अजितदादा बोलले तर मी आणखी गौप्यस्फोट करेन’, पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तास्थापनेसाठी चर्चा करत होते. त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती. आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काही गोष्टी ठरल्या होत्या. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतरच आम्ही शपथविधी घेतला होता. पण, या सर्व गोष्टी ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.