कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने घडामोडींना वेग आला आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभा आणि देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या एकत्र होतील की स्वतंत्र यावरही संभ्रम निर्माण झालेला असताना महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ जागांचं वाटप मविआतील मित्रपक्षांमध्ये कशा प्रकारे असेल? याची चर्चा सुरू असताना यासंदर्भात फॉर्म्युला ठरल्याचे अंदाज लावले जात आहेत. याबाबत संजय राऊतांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यावर राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
१६-१६ चा फॉर्म्युला ठरला?
संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर माहिती दिली आहे. “आमची पहिली बैठक शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. त्या बैठकीला उद्धव ठाकरेही होते. पण १६-१६ चा फॉर्म्युला ठरला ही बातमी मला तुम्ही देताय. आम्हाला माहिती नाही. बैठकीत जे काही ठरलंय, त्याबाबत बाहेर आलेली माहिती चुकीची आहे. असा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“बेकायदेशीर सरकारवाल्या लोकांना…”
“लोकसभा जागावाटपासंदर्भात आता प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांकडे जेव्हा आम्ही बसलो, तेव्हा बैठका कुणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, काय सूत्र असावं यावर चर्चा झाली. आकडा ठरलेला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि राहणार. लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या वज्रमुठीनंच लढवल्या जातील. कुणी काहीही म्हणू द्या. बेकायदेशीर सरकारवाल्या लोकांनी काहीही म्हणू द्या. आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, होणारही नाहीत. आम्ही एकत्र राहूनच सध्याच्या घटनाबाह्य सरकारला सत्तेवरून घालवणार”, असं राऊत म्हणाले.
शिवसेनेला काय जागा अपेक्षित?
दरम्यान, जागावाटपात ठाकरे गटाला किती जागा मिळतील? या प्रश्नावर संजय राऊतांनी सूचक विधान केलं. “आम्ही काय बाजारात उभे आहोत का? आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. त्या तर राहणारच. राष्ट्रवादीनं ४ जागा जिंकल्या आहेत. त्यावर कशी चर्चा होणार? काँग्रेसनं जरी चंद्रपूरची एक जागा जिंकली असली, तरी एक जागा त्यांच्याकडे राहणारच आहे. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या जागा असतात. त्या जिंकून आल्यानंतर कोण इकडे-तिकडे गेला त्यानं फरक पडत नाही. पण जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आमचे आज महाराष्ट्रात १८ आणि दादरा-नगर हवेलीत एक खासदार निवडून आले आहेत. असे १९ खासदार आमचे आहेत. तो आमचा आकडा कायम राहील असं म्हणतोय मी. ही आमची मागणी नाही”, असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.
“रामटेक जागा शिवसेनेची आहे. सातत्याने ती जागा शिवसेना निवडून आणतेय”, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, एकीकडे महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये कोणत्या प्रकारे जागावाटप केलं जाईल, यासंदर्भात तर्कवितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे आधाडीतील इतर मित्रपक्ष आणि प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला किती जागा येणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. हे तिन्ही पक्ष २०१९मध्ये निवडणुका झाल्यानंतर एकत्र आले होते. त्यामुळे आता निवडणूकपूर्व आघाडी म्हणून त्यांच्यात कशाप्रकारे समन्वय दिसेल, याबाबत सामान्य मतदारांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे.