Sanjay Raut On Bangladesh Political Crisis : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यानंतर आता भारतातही यासंदर्भात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही बांगलादेशमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना बांगलादेशमधील अराजकतेबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, शेख हसीना या पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्या असून लोकशाहीच्या माळा जपत त्यांनी हुकूमशाही पद्धतीने देश चालवला, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“शेख मुजीबूर रहमान आणि त्यांच्या कुटुंबियांचे भारताशी चांगले संबंध राहिले आहेत. इंदिरा गांधींमुळेच पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करण्यात आली. पण शेख हसीना यांच्याबाबत इतकंच सांगता येईल, की त्यांनी लोकशाहीचा मुखवटा लावून हुकूमशाही चालवली होती. लोकशाहीच्या नावाखाली जे कुणी आपल्या देशात हुकूमशाही चालवतात, स्वातंत्र धोक्यात आणतात, त्यांना देशातील जनता माफ करत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“बांगलादेशच्या परिस्थितीवरून आपल्या राज्यकर्त्यांनी धडा घ्यावा”
“भारतासारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती. तिथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला, निवडणुकीत घोटाळे झाले. विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं. अनेकांची हत्या करण्यात आली. संसदेत नको ते कायदे पारित करण्यात आले. जनता महागाईशी लढत होती. अशावेशी शेख हसीना या पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्या. लोकशाहीच्या माळा जपत त्यांनी हुकूमशाही पद्धतीने देश चालवला. त्याचा काय परिणाम झाला, त्याचं चिंतन भारतातल्या राज्यकर्त्यांनीही केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबाबती दिली माहिती
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबतही माहिती दिली. “उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून ते दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच इतर पक्षातील काही नेते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीची भेट घेणार असल्याचे” संजय राऊतांनी सांगितले.