दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी चिन्हं आहेत. या चर्चा सुरु झाल्या कारण सचिन अहिर यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता आता त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन अहीर नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे, ही केवळ दोन पक्षांची गरज नसून ते राज्यासाठी गरजेचे आहे. ही लोकांच्या मनातील भावना आहे. आता गणपती संपल्यानंतर पितृपक्ष सुरु होत आहे. त्यामुळे आता दसऱ्याला चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. दसरा मेळाव्यात आमचे नेते सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याला सामोरे कसे जायचे, याविषयी मार्गदर्शन करतील. दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते. त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे, असे सचिन अहिर यांनी म्हटले. राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ हे एकमेकांना कायम बघत असतात. दसरा मेळाव्याला हे दोघे स्टेजवर एकत्र येतील, का माहिती नाही. पण आम्ही त्यांना आमंत्रित करु शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. आमच्याप्रमाणे त्यांचाही मेळावा असतो. त्यामुळे तेदेखील आम्हाला आमंत्रित करु शकतात असंही अहिर म्हणाले होते. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी एक प्रकारे ही शक्यता फेटाळली आहे.

संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

संजय राऊत म्हणाले की, दसरा मेळाव्यात एकत्र येण्याबाबत मला माहित नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा वेगळा मेळावा असतो. आमचही विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे तसं होणं शक्य नाही. दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात. भविष्यामध्ये काम करण्यासाठी एकत्र येऊन आमची सहमती झाली आहे. साठ वर्षापेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संजय राऊत यांनी एका अर्थाने फेटाळली आहे असंच म्हणता येईल.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यातल्या भेटीगाठी कशा होत्या?

२७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झालं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली गेली. राज ठाकरे हे गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले तर उद्धव ठाकरे गणपतीच्या निमित्ताने शिवतीर्थावर गेले होते.