गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदारांकडूनही अशा प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे खुद्द अजित पवार यांनी जरी या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं, तरी अद्याप त्यावर पडदा पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या नाराजीबाबत माध्यमांनी प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

उष्माघात प्रकरणावरून हल्लाबोल

संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. “समोर ६-७ तास उन्हात बसलेल्यांची सोय न पाहाता व्यासपीठावर जो राजकीय मंच सजला होता, आप्पासाहेब वगळता, त्यांच्या कुरघोड्या सुरू होत्या. तो सगळा समुदाय फक्त आप्पासाहेबांचा होता. राजकीय नव्हता. तरीही राजकारणाने त्यांचा अंत पाहिला. तिथले लोक उष्माघाताने कोसळले”, असं संजय राऊत म्हणाले.

“लाखो भक्तांची व्यवस्था पाहण्यापेक्षा राजकीय व्यवस्था पाहण्यात आली. त्यातून ही दुर्घटना घडली. कार्यक्रम किती काळ चालायला हवा हे सरकारला कळायला हवं होतं. पण सरकारने फक्त राजकीय सोय बघितल्यामुळे ही दुर्घटना घडली”, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

Video: महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातानं ११ जणांचा मृत्यू, अजित पवारांनी सांगितली नेमकी चूक; म्हणाले, “…हेच आयोजकांचं चुकलं!”

‘शरद पवारांनी स्पष्ट केलंय की…”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस मविआमधून बाहेर पडणार नाही हे शरद पवारांनीच स्पष्ट केल्याचा पुनरुच्चार संजय राऊतांनी केला. “शिवसेना ज्या प्रकारे ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणांचा दबाव टाकून फोडली आणि हे सरकार बनवण्यात आलं, त्याच प्रकारचा दबाव एनसीपी फोडण्यासाठी टाकला जात आहे. काही आमदारांबाबत काही प्रकरणं चालू आहेत. त्यांच्यावर धाडी घालण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यांना सांगितलं जातंय की तुम्ही राष्ट्रवादी सोडा आणि भाजपाला पाठिंबा द्या. हे शिवसेनेच्या बाबतीत झालंय. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की या दबावामुळे कुणी पक्षातून बाहेर पडणार असेल, तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. तो पक्षाचा निर्णय नाही. पक्ष म्हणून राष्ट्रवादी कधीच भाजपाबरोबर जाणार नाही. तो मविआचाच भाग असेल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“विरोधकांची सरकारं पाडण्यासाठी विमान मिळतं, पण…”, ठाकरे गटाचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार भाजपासोबत खरंच जाणार का?

दरम्यान, वैयक्तिक निर्णय म्हणताना शरद पवारांचा रोख अजित पवारांच्या दिशेनं असल्याचेही दावे करण्यात आले. यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी स्पष्ट भूमिका मांडली. “अजित पवार काल आमच्याबरोबर होते. नागपुरातल्या सभेसाठीही ते होते. त्यांचा काल आमच्याबरोबर चांगला संवाद होता. नागपुरातून मुंबईला येताना अजित पवार आमच्याच विमानात होते. मला अजिबात वाटत नाही की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून वेगळ्या दिशेने जातील. एकंदरीत त्यांच्या भूमिका परखड आहेत. ते स्पष्ट बोलतात. काल रात्री ते स्वत: उद्धव ठाकरेंसमवेत नवी मुंबईतील रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करत होते”, असं संजय राऊत म्हणाले.