काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काल काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज आहेत, अशी सर्वत्र चर्चा आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून त्यांनी कळवले आहे. या घनटेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. यामुळे काँग्रेसमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींमुळे आपली अवहेलना झाल्याचा ठपका ठेवत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा सादर केल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब थोरात यांनी घेतेलेल्या या तडकाफडकीच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, “कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत.” असं म्हटलं होतं. यावर आज शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. हेही वाचा - “बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्याने अशी बंडाची भूमिका घ्यावी, म्हणजे नक्कीच…” संजय राऊतांचं विधान! संजय राऊत म्हणाले, “ते कोणालाही सामावून घ्यायला तयार आहेत. त्यांच्या पक्षात बहुतेक कोणी उरलेलं नाही आता. रिकाम्या जागा भरा असंच आहे. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे. तिथे भाजपा हे कार्यकर्ते घडवण्याचा उद्योग करतो. बहुदा त्या कार्यकर्ते घडवण्याच्या उद्योगाला, संस्थेला त्यांनी टाळं लावलेलं दिसत आहे. म्हणून इतर पक्षाचे तयार कार्यकर्ते घेऊन, आपला पक्ष पुढे नेण्यासाठी जी धडपड सुरू आहे. मग शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल. मूळचा भाजपा आहे कुठे? आपण जर पाहीलं तर सगळे इथून तिथून, हौशे-नवशे-गवशे हे घेऊनच त्यांचा पक्ष आज उभा आहे. मूळ विचारांचा पक्ष कुठे आहे? यावर बावनकुळे यांनी एकदा भाष्यं केलं पाहिजे.” हेही वाचा - बाळासाहेब थोरात यांना भाजपामध्ये प्रवेश देणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आम्ही पक्ष वाढविण्यासाठी…” याशिवाय “आम्ही घडवलेले कार्यकर्ते हे तुम्ही दाब, दबावाने उचलता किंवा त्यांच्या मानसिक अवस्थेचा फायदा घेऊन आपला पक्ष वाढवताय, बाकी नवीन काय आपल्याकडे? अगदी कसबा आणि चिंचवडचे उमेदवार जरी आपण पाहिले, तरी ते मूळ भाजपाच्या विचाराचे नाहीत.” असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते? - “आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम; आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो. जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो. पण बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता मला वाटत नाही. बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले होते. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हटलं होतं.