काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत असल्याचा आरोप भाजपा आणि शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे गट) सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसला आणि राहुल गांधींना उत्तर म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट राज्यात लवकरच ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांनी तयारीदेखील सुरू केली आहे. परंतु या यात्रेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने टीका केली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपा-शिंदे गटाची ही वीर सावरकर गौरव यात्रा म्हणजे एक ढोंग आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा शिवाजी महाराज गौरव यात्रा यांनी का काढली नाही? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. याबाबत टीव्ही ९ मराठीशी बोलत असताना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट म्हणाले की, शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा हे (ठाकरे गट) काय करत होते.

हे ही वाचा >> ‘धर्मवीर’ सिनेमात ‘वसंत डावखरे’ साकारणाऱ्या अभिनेत्याचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही गोट्या खेळत होता का?”

शिरसाट म्हणाले की, मला त्यांना विचारायचं आहे, शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा तुम्ही काय करत होता? तुम्ही काय करणार आहात? सगळंच आम्ही करायचं मग तुम्ही काय करत होता, तुम्ही गोट्या खेळत होता का? महाराजांच्या अपमानाची जाण तुम्हाला नव्हती का? तुम्ही आज काय करताय? तुम्हीही गौरव यात्रा काढा. शिरसाट म्हणाले की, यांचं राजकारण असंच आहे. दुसऱ्याच्या अंगावर सगळं ढकलून द्यायचं आणि स्वतःचं राजकारण सुरक्षित ठेवायचं.