औरंगाबाद शहराचं नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ’धाराशिव’ करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. ज्याला काल केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर आता राज्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीस सरकार व महाविकास आघाडीमधील नेते मंडळींकडून या मुद्य्यावरून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही यावरून शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला होता. त्यांना आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्र सरकारने नामांतराच्या प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराचे प्रस्ताव आम्ही मंजुर केले होते. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांच्या नावाच्या प्रस्तावांना आज मुंजरी मिळाली आहे. म्हणून सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारला एवढ्या पुरतं तरी धन्यवाद देतो की, इतर अनेक निर्णयांना त्यांनी स्थगिती दिली होती, मात्र आम्ही जो नामांतराच्या प्रस्तावाच निर्णय घेतला होता, त्याला स्थिगिती दिली नाही. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.”

हेही वाचा – “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी आहेत आणि त्यांना…” आमदार शिरसाटांचं MIM खासदार जलील यांना प्रत्युत्तर!

यावर प्रत्युत्तर देताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत, त्यांना टोला मारण्याची सवय आहे. परंतु, आम्ही जे केलं आहे त्यातमध्ये तुम्ही समाधान मानायला काय हरकत आहे. त्यांनी ठराव केव्हा घेतला, तर शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत जेव्हा सरकार कोसळण्याच्या परस्थितीत होतं. तोही कॅबिनेटचा ठराव. असा ठराव घेतला आणि आम्हीच केलं असं म्हणायचं हे लोकांना पटत नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जरी नामांतर झालं असलं तरी त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, खोचक टोला मारण्याची गरज नव्हती.” टीव्ही 9 शी ते बोलत होते.

हेही वाचा – “नामांतर झालं याचा आनंद आहे, मात्र भाजपाने याचा असुरी आनंद घेऊ नये हे श्रेय…” अमोल मिटकरीचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय “मी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. आभार यासाठी की गेली ३० वर्षे आम्ही हा लढा लढतो आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा संभाजीनगर पहिलं पाऊल ठेवलं होतं, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत संभाजीनगरची घोषणा त्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत केली होती. परंतु आम्ही महापालिकेत आम्ही ठराव घेतल्यानंतरही काही लोक जे या शहराचं नाव बदलू इच्छित नव्हते. उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि हा विषय प्रलंबित राहत गेला. अनेकवेळा अशाही चर्चा व्हायच्या की हे संभाजीनगर होणार आहे की नाही? की ही फक्त राजकीय खेळी आहे. परंतु मागील सरकाच्या काळातही बदल झाली नाही, पूर्वीही बदल झाला नाही. मात्र आता शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात जेव्हा सरकार आलं, तेव्हा पहिला हा ठराव घेतला गेला. आज नाव बदललं गेल्याचं समाधान आमच्या शहरातील प्रत्येक नागरिकांना आहे.” असंही शिरसाट यांनी यावेळी सांगितलं.