सावंतवाडी: महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा सातार्डा-न्हयबाग महामार्गावरील पूल अत्यंत धोकादायक बनला असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलाला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून, या जीर्ण पुलावरून प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः कामासाठी दररोज ये-जा करणारे हजारो तरुण-तरुणी आणि पर्यटक यामुळे धास्तावले आहेत.
संरक्षक कठडेही जीर्ण; २०१६ च्या सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती या पुलाचे संरक्षक कठडेही जीर्ण झाले असून त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. २०१६ मध्ये मध्यरात्री सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती सातार्डा पुलावर होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. पालकमंत्री आणि आमदारांनी लक्ष घालावे, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
या गंभीर परिस्थितीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी केवळ “मलमपट्टी करून डोळ्यात धुळ फेकण्याचे काम” केले असल्याचा आरोप करत, श्री. कवठणकर यांनी यावर ठोस उपाययोजना करून आठ दिवसांच्या आत हा मार्ग निर्धोक करावा अशी मागणी केली आहे. असे न केल्यास ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही श्री. कवठणकर यांनी दिला आहे.
यावेळी संतोष गोवेकर, नामदेव गोवेकर, साई कवठणकर, सदू टेमकर, यामेश्वर कवठणकर, निखिल कवठणकर, सुप्रेश कवठणकर, गिरीश परब, प्रवीण बर्वे, अनिकेत धारगळकर, यश उर्फ दाय कवठणकर, प्रमोद कवठणकर, स्वप्निल हरमलकर, संजय पालव, रघुनाथ जाधव, जयेश पोळजी, माजी उपसरपंच तळवणे आपा बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. या धोकादायक पुलामुळे होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.