लातूर : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ही सांस्कृतिक गरज आहे ,चित्रपट रसिकांच्या विचाराच्या कक्षा यामुळे रुंदावतील .जगभर चित्रपट क्षेत्रामध्ये नेमके काय चालले आहे? हे पाहायला मिळेल असे मत जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केले .तिसऱ्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र शासन ,पुणे फेस्टिवल फाउंडेशन, विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या पुढाकाराने आयोजित चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन जब्बार पटेल यांच्या हस्ते झाले याप्रसंगी लातूरचे आमदार अमित देशमुख ,आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे ,बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे आदी उपस्थित होते. जब्बार पटेल यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अनेक आठवणी सांगितल्या, राजकपूर व महंमद रफी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे याचिही आठवण त्यांनी करुन दिली.अमित देशमुख यांनी मुंबई ,पुणे ,नागपूर अशा शहरांमध्ये चित्रपट महोत्सव होतात ग्रामीण भागातील रसिकांची भूक भागवण्याचे काम चित्रपट महोत्सवांमधून होते त्यामुळे ग्रामीण भागात चित्रपट महोत्सव आयोजित केले पाहिजेत व त्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने भरघोस अनुदान देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली .
अमित देशमुख यांना महायुतीत येण्याचे निमंत्रण
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी अमित देशमुख यांनी महायुती सरकारमध्ये सामील व्हावे आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री व्हावे असे आवाहन केले, त्याला उत्तर देताना अमित देशमुख यांनी मी आहे तिथे बरा आहे ,राजकीय समतोल साधण्यासाठी मी ज्या पक्षात आहे तिथेच योग्य आहे. कदाचित भविष्यात समतोल साधण्यासाठी तुम्हालाच आमच्या सोबत यावे लागेल असे टिप्पणी केली.