शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होईन जवळपास दहा महिने उलटली आहेत. असं असलं तरी शिंदे गट आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप कमी होताना दिसत नाहीयेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे नेते शिवसेना पक्षाला संपवण्यासाठी हळुवारपणे प्लॅन करत होते, असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील यांनी केला.
‘एबीपी माझा’शी संवाद साधताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचा बारकाव्याने अभ्यास केला, तर लक्षात येईल की, त्यांच्याजवळ जे गेले त्यांना शरद पवारांनी हळूच चिरडून संपवलं आहे. सगळे राजकीय पक्ष प्रेमाने शरद पवारांकडे गेले होते, पण शरद पवारांनी शेकापसह सर्व लहान पक्षांना संपवलं. शिवसेनेला तर शरद पवार कधीच माफ करू शकत नाहीत. कारण या राज्यात शिवसेनेच्या लोकांनी जेवढी शरद पवारांवर टीका केली, तेवढी टीका कुठल्याही पक्षाने केली नाही.”
हेही वाचा- “…म्हणून मला लपून राहावं लागलं”, पोलिसांच्या दबावाबद्दल रॅपर राज मुंगासेचा मोठा खुलासा!
शिवसेनेच्या ४० आमदारांच्या तिकीट कापण्याच्या प्लॅनबद्दल गौप्यस्फोट करताना शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, “आगामी निवडणुकीत शिवसेनेला १० ते १५ जागांच्या वर जाऊ द्यायचं नाही, यासाठी अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते हळुवारपणे प्लॅन करत होते. दुर्दैवी आमचे नेते उद्धव ठाकरे त्यांच्या काही आजाराच्या कारणामुळे ही परिस्थिती बघायला मंत्रालयाकडे जात नव्हते.”
“हा धोका ओळखून हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना ही तडफदार वाटली पाहिजे. पुढे गेली पाहिजे. या विचाराने आम्ही खंबीर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व दिलं. आमची शिवसेना वाढणार आणि सगळ्या निवडणुका प्रचंड मतांनी जिंकणार आहोत. सर्वसाधारणपणे शिवसेनेतील ४० लोकांची यादी त्यांच्याकडे होती, त्यामध्ये शहाजीबापू पाटीलही होते,” असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील यांनी केला.