Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आज नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेतेही उपस्थित होते. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी, अशा मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

या मोर्चात बोलताना शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ असा उल्लेख करत तुफान फटकेबाजी केली. तसेच नेपाळमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांचा दाखला देत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक सल्लाही दिला आहे. नेपाळमध्ये काय घडलं? राज्यकर्ते गेले आणि एक भगिनी आली. त्यावरून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणाची भूमिका घेतील असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“देवाभाऊंना माझी विनंती आहे की हिंदुस्तानच्या आजूबाजूला बघा काय घडतंय? नेपाळमध्ये गेल्या आठ दिवसांत काय घडलं? राज्यकर्ते गेले. एक भगिनी आली आणि तिच्या हातात सत्ता देण्यात आली. आणखी काय झालं मी त्याच्या खोलात जात नाही. पण शहाणपणा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘…तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही’ : शरद पवार

“आज नाशिकचा कांदा जगात जातो. शेतकऱ्यांना आशा असते की कांदा विकल्यानंतर दोन पैसे मिळतील. मात्र, आज कांद्याला दर नाही. कांदा निर्यात करा, त्यामुळे दर वाढतील. मात्र, केंद्र सरकार कांदा निर्यात करत नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? यावर उत्तर शोधायचं असेल तर या सरकारवर दबाव आणला पाहिजे. देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत असल्याचं तुम्ही देशाला दाखवलं. मात्र, देवाभाऊ शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीत. असं चित्र असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाहीत. पण सरकार शेतकऱ्यांकडे दुलर्क्ष करत असेल तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘शेतकऱ्यांकडे पाहायला राज्यकर्त्यांना वेळ नाही’ : शरद पवार

“महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम शेकरऱ्यांवर झाला आहे. संकट येत असतात. त्यावर मार्ग काढायचा असतो. ही जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची असते. मात्र, आपण आज पाहतो की शेतकऱ्यांकडे पाहायला आजच्या राज्यकर्त्यांना वेळ नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांत दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी जीव का देतो? शेतकरी एवढी टोकाची भूमिका का घेतो? याचं कारण शेतकऱ्यांच्या संटकाच्या काळात मार्ग काढण्याची जबाबदारी सरकार घेत नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.