एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात परिवर्तन झालं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपलं सरकार स्थापन झालं. छत्रपती शिवरायांच्या पावलावर डोकं ठेवून आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणारं सरकार महाराष्ट्रात आलं. सरकार आल्यानंतर वेगाने कामं सुरु केली. सगळ्यात महत्त्वाचं काम आपण केलं ते म्हणजे औरंगाबादचं नाव हे आपण छत्रपती संभाजी नगर असं आपण केलं. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. छत्रपती संभाजी नगर येथील गंगापूर या ठिकाणी ते बोलत होते.
शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका
छत्रपती संभाजी नगर हे औरंगाबादचं नाव होणं हे तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न फडणवीसांनी मोदी @9 या कार्यक्रमातल्या लोकांना विचारला त्यांनी हो असं उत्तर दिलं. त्यानंतर फडणवीस म्हणाले, “छत्रपती संभाजी नगर हे नाव शरद पवारांना मान्य नाही. ते म्हणाले तुम्ही नाव काहीही करा मी औरंगाबादच म्हणणार. पवारसाहेब तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलंत तरीही छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कुणीही काढू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही कधीच विसरु शकत नाही. आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने या ठिकाणी आलो तेव्हा आपल्या एक भेट दिली पाहिजे असं मला वाटलं. आमदार प्रशांत बंब हे एका योजनेचा पाठपुरावा करत होते. जी योजना गंगापूरचं चित्र बदलू शकते. ती म्हणजे गंगापूर सिंचन उपसा योजना. ३० हजार एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. १०० टक्के पाईप आणि ड्रीपने इथल्या शेतकऱ्यांचं भाग्य बदलणार आहे. आम्ही या योजनेला कॅबिनेमटमध्ये मान्यता दिली. या योजनेच्या भूमिपूजनाला दिवाळीच्या पाडव्याला येऊ” असंही फडणवीस यांनी जाहीर केलं.
आमदार प्रशांत बंब यांचं कौतुक
प्रशांत बंब यांच्या पाठ पुराव्यामुळे ही योजना या ठिकाणी येऊ शकते आहे. सरकार कसं गतिमान आहे बघा. मागच्या म्हणजे उद्धवजींच्या सरकारमध्ये एकाही योजनेला फेरप्रशासकीय योजनेला मान्यता अडीच वर्षांत दिली नाही. आम्ही एका वर्षात ३५ योजनांना मान्यता दिली. साडेआठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल इतक्या योजनांना मान्यता दिली आहे. रत्नापूर तालुक्यासाठीही निधी आम्ही देणार आहोत.
मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्ती देणं हे आमचं उद्दीष्ट आहे. आम्हाला इथे परिवर्तन घडवायचं आहे. मला विश्वास आहे की हे परिवर्तन आपण करुन दाखवू. मोदीजींच्या बरोबर डबल इंजिन सरकार आहे. एकमेकांना सोबत घेऊन चालणारं डबल इंजिन महाराष्ट्रालाही पुढे घेऊन जातील असाही विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मोदींच्या नेतृत्वात भारतात लोकशाही जिवंत आहेच आणि ती समृद्ध होते आहे असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही सांगितलं आहे. मोदींचे सगळे विरोधक पाटण्याला एकत्र आले होते. पण मला सांगा यांच्याकडे एक नेता आहे का? जो मोदींच्या तोडीचा आहे? तुम्हाला सहा महिने राज्य देतो तुम्ही एक नेता ठरवून दाखवा. असंही आव्हान फडणवीस यांनी दिलं. या देशात एकच नेता आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.