रानकवी म्हणून मराठी साहित्यात स्वतःची ओळख निर्माण करणारे आणि कवितांमध्ये निसर्ग आणणारे ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांचं निधन झालं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ना.धो. महानोर यांना अत्यंत हळव्या शब्दांमध्ये ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
काय म्हटलं आहे शरद पवारांनी?
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.
हे पण वाचा- ‘रानातल्या कवितां’ची कुळकथा..
रानकवी ना. धो. महानोरांच्या निधनामुळे साहित्याशी संबंधित सगळेच नागरिक अस्वस्थ झाला असेल यात माझ्या मनात शंका नाही. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. महानोरांच्या शब्दांमधून निसर्ग बोलायचा. कष्ट करुन उत्तम पिक कसं काढता येईल? याकडेही महानोर यांचं लक्ष असे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांच्या रानाच्या कविता, पावसाळी कविता त्यांनी लिहिल्या. जैत रे जैत या सिनेमासाठी त्यांनी गाणी लिहिली. मराठी माणसाच्या स्मरणात आहेत, कायम राहतील असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनीही ना. धो. महानोर यांना आदरांजली वाहिली आहे. ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांचं निधन ही आम्हा सर्वांसाठी व्यक्तिगत हानी आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- जगलो, तेच लिहीत गेलो
काय आहे सुप्रिया सुळेंचं ट्विट?
ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी व्यक्तिगत हानी आहे. महानोरांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात बालकवी आणि बहिणाबाई यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवला. कवितेतून माती,शेती आणि संस्कृतीची नवी ओळख करुन दिली. त्यांच्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘रानातल्या कवितां’ आदी अनेक रचना अजरामर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे साहित्याला मातीशी जोडून ठेवणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला.या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण महानोर कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.