Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला. महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर नेत्यांनी आता पराभवाची कारणं नेमकी काय? यावर विचारमंथन करण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पराभूत झालेल्या उमेदवारांबरोबर चर्चा केली. त्यानंतर शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध विषयासंदर्भात भाष्य केलं. याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतोद निवडीबाबत प्रश्न विचारण्यात आला. रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का करण्यात आलं? असं विचारलं असता शरद पवारांनी यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.

हेही वाचा : “मी १४ निवडणूक लढलो, कधीही पराभव नाही; पण यावेळी…”, शरद पवारांचं निकालावर मोठं विधान

शरद पवार काय म्हणाले?

रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का केलं? या प्रश्नांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “कुठेही रोहित पवारांना बाजूला करून रोहित पाटलांना प्रतोद करण्यात आलेलं नाही. तर रोहित पवारांनीच रोहित पाटील यांचं नाव सुचवलं होतं. रोहित पवार यांनीच आग्रह धरला होता की रोहित पाटील यांना प्रतोद करावं. त्यानंतर हा निर्णय आम्ही एकमताने घेतला. आम्ही पाहतोय की आर आर पाटील यांची काम करण्याची जी पद्धत होती, तीच पद्धत रोहित पाटील यांची देखील आहे. दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीत साम्य आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की रोहित पाटील यांच्यामध्ये काम करण्याची धडपड आहे, त्यामुळे आपणही त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे”, असं शरद पवारांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या तीन नेत्यांवर महत्वाची जबाबदारी?

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. त्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी एकमताने आमदार जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या गटनेते म्हणून निवड करण्यात आली, तर पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील आणि उत्तम जानकर यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली.