वाई: आपले अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले, त्यामुळे राजकारणात झालेल्या या बदलाची चिंता मी करत नाही. सत्ता येते आणि जाते. पक्ष संघटन करण्यासाठी वय आडवे येत नाही. मी लवकरच राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन नवीन नेतृत्व उभे करणार आहे, असे मत शरद पवार यांनी साताऱ्यातील लोणंद येथे सांगितले. लोणंद (ता. खंडाळा) येथे आयोजित शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.संयोजक डॉ नितीन सावंत यांनी प्रास्ताविक केले. हेही वाचा >>>कल्याण-लातूर प्रवास केवळ चार तासांत पवार म्हणाले, की पक्ष आणि चिन्ह गेलं तरी लढाई चालू आहे, पक्ष फुटला, सहकारी गेले तरी आजही लोकांचा विश्वास संघटनेवर आहे. पक्ष वाढविण्यासाठी, टिकविण्यासाठीचा लढा देण्यासाठी सामान्य जनतेने आता ढाल बनावे. काही लोक सांगतात विकासासाठी गेलो. पण हे सगळं खोटं आहे. अटल बिहारी वाजपेयी अनेक वर्षे विरोधात होते. तरीही त्यांनी देशाचा विकास केला. यशवंतराव चव्हाण यांनाही त्यांच्या काही सहकाऱ्यांनी विरोध केला म्हणून ते थांबले नाहीत. हेही वाचा >>>अमेरिकन वकिलातीला धमकीचा ई-मेल पाठवणारा स्किझोफ्रेनियाग्रस्त वयाचा मुद्दा घेत होणाऱ्या वक्तव्याचा संदर्भ देत पवार म्हणाले, की वयाच्या ८५ व्या वर्षी मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यामुळे वयाचा मुद्दा मी मनावर घेत नाही. यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांनी ज्याप्रमाणे राजकारणात वेळोवेळी नवीन नेतृत्व उभे केले, त्याच पद्धतीने राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन नवीन नेतृत्व उभे करणार आहे. अशा सर्व बदलांना लोकांनी साथ द्यावी, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.यावेळी त्यांनी आमदार मकरंद पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. पवार म्हणाले, की लक्ष्मणराव पाटील कुठे आणि त्यांची आताची पिढी कुठे, याचा विचार करावा लागेल. रोहित पवार यांनीही अजित पवारांवर टीका केली. आज इंग्रज असते तर ते सत्तेसाठी इंग्रजांबरोबर देखील गेले असते, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. यावेळी ‘सोनाई ॲग्रो’चे दशरथ माने यांचा कृषी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.