Sharad Pawar On Devendra Fadnavis : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने अध्यादेश काढला आहे. मात्र, या अध्यादेशानंतर राज्यात ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने येत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. दुसरीकडे राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या सर्व परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात बोलताना शरद पवारांनी सरकारला मोठा इशारा दिला. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार जर योग्य ते निर्णय घेत नसेल तर आम्हाला फक्त बघ्याची भूमिका घेता येणार नाही. ही फक्त सुरूवात आहे’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम शेकरऱ्यांवर झाला आहे. संकट येत असतात. त्यावर मार्ग काढायचा असतो. ही जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची असते. मात्र, आपण आज पाहतो की शेतकऱ्यांकडे पाहायला आजच्या राज्यकर्त्यांना वेळ नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांत दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी जीव का देतो? शेतकरी एवढी टोकाची भूमिका का घेतो? याचं कारण शेतकऱ्यांच्या संटकाच्या काळात मार्ग काढण्याची जबाबदारी सरकार घेत नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.

“मी कृषी खात्याचा मंत्री होतो आणि एका दिवशी माझ्या वाचणात आलं की यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. तेव्हा मी अस्वस्थ झालो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तत्कालीन पंतप्रधानांना विनंती केली की शेतकरी जीव देतोय. शेतकरी जीव का देतोय हे समजून घेतलं पाहिजे. तेव्हा मनमोहन सिंह पंतप्रधान होते. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही यवतमाळला गेलो आणि ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेव्हा त्या शेतकऱ्याच्या पत्नीने संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर आम्ही दिल्लीला गेलो आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. मात्र, आज काय परिस्थिती आहे?”, असं शरद पवार यांनी म्हटलं.

‘…तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही’ : शरद पवार

“आज नाशिकचा कांदा जगात जातो. शेतकऱ्यांना आशा असते की कांदा विकल्यानंतर दोन पैसे मिळतील. मात्र, आज कांद्याला दर नाही. कांदा निर्यात करा, त्यामुळे दर वाढतील. मात्र, केंद्र सरकार कांदा निर्यात करत नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? यावर उत्तर शोधायचं असेल तर या सरकारवर दबाव आणला पाहिजे. देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत असल्याचं तुम्ही देशाला दाखवलं. मात्र, देवाभाऊ शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीत. असं चित्र असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाहीत. पण सरकार शेतकऱ्यांकडे दुलर्क्ष करत असेल तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आज नाशिकचा हा मोर्चा फक्त सुरूवात आहे. ही सुरूवात येथेच थांबणार नाही. देवाभाऊंना माझी विनंती आहे की जरा आजूबाजूला पाहा. काय घडतंय? नेपाळमध्ये काय घडतंय ते पाहा. तेथील राज्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी एक भगिनी आली आणि तिच्या हातात तेथील सत्ता देण्यात आली”, अशी टीका शरद पवार यांनी सरकारवर केली.