शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर आगामी सर्व निवडणुका शिंदे गट आणि भाजपा युतीत लढेल असं दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी अनेकदा सांगितलं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको,” असं मोठं विधान केलं आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असताना अब्दुल सत्तार यांनी केलेल्या या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू.”

“दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे”

“दिल्लीत आणि मुंबईतसह जिल्ह्यात, महापालिकेत, जिल्हा परिषदेत सोबत राहू. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल.”

“मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन”

निवडणुकीतील चिन्ह आणि आपल्या मतदारसंघातील आपली ताकद यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन. कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो. मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही. कार्यकर्ता पद कुणी हिसकावूनही घेऊ शकत नाही. आमदार, खासदार, मंत्रीपद निघून जाईल, आणखी काही पदं असतील ती जातील, पण कार्यकर्ता हे पद कधीही जात नाही.”

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी CM शिंदेंचं नेतृत्व मान्य करत जुळवून घ्यावं, कारण…”; शिंदे गटातील अब्दुल सत्तारांचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जसंजसं काम केलं की त्याला जनतेची ताकद मिळते, आशीर्वाद मिळतो. त्यामुळे राजकारणाच्या ट्रॅकवर कितीही गतीरोधक आले तरी गाड्या सरळ मुंबईपर्यंत जातात. दुसरीकडे जनता जनार्दनाने स्वीकारलं नाही, तर पालूतभर वखरावरही कुणी ठेवत नाही,” असंही अब्दुल सत्तार यांनी नमूद केलं.